रेडा -नरूटवाडी (ता. इंदापूर) येथील शेतकरी भीमाशंकर विलास जाधव यांच्या शेतात सोमवारी (दि. 14) रात्री अचानक विजेची तार तुटून आग लागली. या घटनेमुळे सव्वा एकर क्षेत्रातील जवळपास सत्तर टन ऊस जळून खाक झाला आहे.सोमवारी रात्री 8 वाजण्याच्या सुमारास भीमाशंकर जाधव यांच्या शेतातील वीज खांबावर अचानक शॉर्टसर्किट होऊन उसाला मोठी आग लागली.
झालेल्या घटनेची माहिती जाधव यांनी तत्काळ संबंधित प्रशासनाला कळवली असता, या घटनेचा पंचनामा वीज वितरणचे अभियंता डवस, वायरमन चोपडे तसेच तलाठी सचिन करगळ, कृषी विभागाचे अधिकारी प्रशांत मोरे यांनी पंचनामा केला.
आमच्या शेतामध्ये महावितरणच्या खांबावरील वीज वाहक तारा तुटल्याने ऊस पिकाचे मोठे नुकसान झाले आहे. सध्या सप्टेंबर महिना चालू असल्याने आसपासचा कोणताही साखर कारखाना चालू नाही. गूळ कारखान्यालादेखील जळालेला ऊस चालत नाही. त्यामुळे हा ऊस कुठेच पाठवता येत नसल्याने महावितरण कंपनीने नुकसान भरपाई द्यावी.
– भीमाशंकर जाधव, नुकसान ग्रस्त शेतकरी