दरवाजा खराब होऊ नये म्हणून सह्याद्री प्रतिष्ठानने घेतली काळजी
पवनानगर – सह्याद्री प्रतिष्ठान मावळच्या वतीने तिकोना किल्ल्याचे प्रवेशद्वार पावसाळ्यात पाण्याने व वाहून येणाऱ्या मातीमुळे खराब होऊ नये, म्हणून लीनसेंट ऑइल लावले आहे. यामुळे दरवाजाचे पावसात नुकसान होणार नाही, असे प्रतिष्ठानच्या कार्यकर्त्यांनी सांगितले.
दोन वर्षांपूर्वी सह्याद्री प्रतिष्ठानच्या वतीने दरवाजा बसविण्यात आला होता. पावसाळ्यात येथून वाहणारे पाणी, माती चिखल याने दरवाजा खराब होऊ शकतो. याचीच खबरदारी घेत प्रतिष्ठानच्या वतीने दरवाजाला लीनसेंट ऑइल लावण्यात आले.
सदर मोहीम ही शासनाच्या परवानगीने करोनाच्या पार्श्वभूमीवर सर्व नियमांचे पालन करीत घेण्यात आली. याच प्रमाणे गडावर पावसाळ्यापूर्वीचे गडसंवर्धनाचे काम सह्याद्री प्रतिष्ठानच्या वतीने विशेष मोहीम घेऊन करण्यात आले. या दरवाजाची निगा तिन्ही ऋतूत राखण्याचे काम प्रतिष्ठान उत्तम प्रकारे करीत आहे. या वेळी प्रतिष्ठानचे चेतन वाघमारे, चिन्मय गायकवाड आणि सुजित मोहोळ यांनी गडावर दुर्ग संवर्धनाच्या कामाबरोबरच स्वच्छता मोहीम राबवली.