बारामती -शहरात गेल्या तीन ते चार दिवसांपासून करोनाचा संसर्गाचा भडका उडाला होता. जवळपास 400 रुग्ण शहर व तालुक्यात आढळले आहेत. या पार्श्वभूमीवर नगराध्यक्षा पौर्णिमा तावरे यांनी 14 दिवसांचा जनता कर्फ्यू जाहीर करण्यात आला होता. मात्र, हा निर्णय घेताना विश्वासात घेतले नसल्याचे सांगत व्यापाऱ्यांनी विरोध केला. त्यानंतर 14 दिवसांचा जनता कर्फ्यू 7 दिवसांवर आणला आहे.
यामध्ये रुग्णांची संख्या कमी झाल्यानंतर कर्फ्यू कमी करण्यात येईल. मात्र, रुग्णसंख्या वाढल्यास 14 दिवसांचा कर्फ्यू पुढे सुरुच राहणार असल्याचे प्रांताधिकारी दादासाहेब कांबळे यांनी प्रभातशी बोलताना स्पष्ट केले. शुक्रवारी(दि. 4) बारामती नगरपालिका प्रशासनाकडून दि. 7 सप्टेंबर ते 21 सप्टेंबर (14 दिवस) या कालावधीसाठी जनता कर्फ्यू लागू होणार असल्याचे जाहिर करण्यात आले होते. अनेक लोकांच्या बंदबाबतीत मागणी स्वरुपाच्या सूचना आल्यामुळे हा बंदचा कालावधी कमी केल्याचे तावरे यांनी सांगितले.
या निर्णयासाठी अधिकारीवर्गाने सर्व प्रकारच्या व्यापारी व नागरिकांचे मत घेणे अपेक्षित होते. करोनाची संख्या व परिस्थिती गंभीर असल्यामुळे प्रशासनास हा निर्णय घेणे जरूरीचे वाटत असले तरी, व्यापारी प्रातिनिधिक स्वरुपात नागरिकांबरोबर चर्चा होणे गरजेचे होते. करोनाइतकीच गंभीर परिस्थिती व्यापारी व नागरिकांची आर्थिक बाबतीत झालेली आहे. मागील लॉकडाऊननंतर आत्ता कुठे परिस्थिती थोडी सावरत असताना पुन्हा हा संपूर्णत: लॉकड़ाऊन होऊ घातला आहे. शेतकरी वर्गाचे खरीप हंगामाचे पिक बाजारात येऊ घातले आहे. मूग, बाजरी, मका ही पिके निघालेली आहेत.
रोजच पावसाचे सावट असताना ती विकण्यासाठीची व्यवस्था उपलब्ध नसेल तर शेतकरीवर्गाची मोठी कुचंबना होणार आहे. केंद्र सरकारने मागे जाहीर केलेल्या लॉकडाऊनमध्ये सुद्धा मार्केट यार्डवरील व्यवहार चालू ठेवण्यास परवानगी होती. यावेळेस बंदमध्ये देण्यात आलेली नाही. यावर चर्चा होणे गरजेचे आहे. व्यापारीवर्गाने बरोबर ज्याप्रकारे प्रशासनाने चर्चा करून मार्ग काढला आहे, अशा प्रकारची चर्चा व्हावी, अशी मागणी दि बारामती मर्चेन्ट्स असोसिएशनचे महावीर वडुजकर यांनी केली होती. कर्फ्यूला आमचा विरोध नसून काही बाबतीत चर्चा करून आमच्या व शेतकरीवर्गाची अडचण अधिकाऱ्यांनी जाणून घ्यावी, ही अपेक्षा वडुजकर यांनी व्यक्त केली.
निर्णय घेताना व्यापाऱ्यांना विश्वासात घ्या
व्यापारी महासंघाचे अध्यक्ष नरेंद्र गुजराथी म्हणाले की, व्यापाऱ्यांचे आर्थिक कंबरडे आधीच मोडले आहे. त्यातच 14 दिवसांच्या लॉकडाऊनमुळे हा निर्णय न परवडणारा होता. याबाबत व्यापारी महासंघाला विश्वासात घेतले नसल्याने उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडे तक्रार करण्यात आली.
त्यानंतर उपविभागीय अधिकारी दादासाहेब कांबळे, नगराध्यक्षा, पोलीस निरीक्षक औदुंबर पाटील यांच्या उपस्थितीत बैठक घेण्यात आली. यावेळी व्यापाऱ्यांनी त्यांच्या अडचणी मांडल्या. त्यानंतर निर्णय बदलण्यात आल्याचे गुजराथी यांनी सांगितले. शहरातील निर्णय घेताना व्यापाऱ्यांना विश्वासात घेण्याची अपेक्षा आहे.
कर्फ्यूमधून वृत्तपत्र, दूध विक्रीला सूट
बारामतीत 7 दिवस जनता कर्फ्यू जाहिर करण्यात आला आहे. यामध्ये शहराच्या सीमा सील करण्यात येणार आहेत. एमआयडीसीतील कंपन्या वगळता संपूर्ण सेवा व्यवसाय बंद राहणार आहेत. मात्र, यामध्ये वृत्तपत्र, दुधासह अत्यावश्यक सेवा व्यवसाय कर्फ्युमधून वगळण्यात आल्याचे प्रशासनाने स्पष्ट केले आहे. जीवनावश्यक वस्तूंचा साठा करण्याचे आवाहन केले आहे.