काबुल : अफगाणिस्तानावर ताबा मिळवल्यानंतर तालिबानचा खरा चेहरा आता जगासमोर येण्यास सुरुवात होत आहे. कारण त्यांना विरोध करणाऱ्यांना शोधून संपवण्याचा प्रयत्न सध्या करत आहे. त्याचेच एक उदाहरण आता उघड झाले आहे. अफगाणिस्तानची राजधानी काबूलमध्ये बंदुकीच्या धाकावर अफगाण वंशाच्या भारतीय नागरिकाचे त्याच्या दुकानाजवळून अपहरण करण्यात आले आहे. एका इंग्रजी वर्तमानपत्राने याविषयी माहिती दिली आहे.
तालिबानने एका भारतीय नागरिकाचे अपहरण केले आहे असे सांगितले जात आहे. त्यानंतर आता या घटनेबाबत भारत सरकारशी संपर्क साधण्यात आला आहे. इंडियन वर्ल्ड फोरमचे अध्यक्ष पुनीत सिंह चंडोक यांनी याविषयी माहिती दिली. अफगाणिस्तान वंशाचे भारतीय नागरिक बंस्रीलाल अरेन्डेह यांचे काबूलमध्ये बंदुकीच्या जोरावर अपहरण करण्यात आले. पुनीत सिंह चंडोक यांनी मंगळवारी या प्रकरणात हस्तक्षेप करण्यासाठी भारत सरकारच्या परराष्ट्र मंत्रालयाशी संपर्क साधला आहे असे सांगितले.
अफगाणिस्तान हिंदू-शीख समुदायाकडून त्यांना अफगाण वंशाचे भारतीय नागरिक बंस्रीलालअरेन्डेह (५०) यांचे सोमवारी सकाळी ८ च्या सुमारास काबूलमधील त्यांच्या दुकानाजवळून अपहरण करण्यात आल्याची माहिती देण्यात आली. बंस्रीलाल हे औषध उत्पादनांचे व्यापारी आहेत आणि या घटनेच्या वेळी ते त्यांच्या कर्मचाऱ्यांसह त्यांच्या दुकानात व्यस्त होते.
बंस्रीलाल यांचे त्यांच्या कर्मचाऱ्यांसह अपहरण करण्यात आले होते, पण त्यांचे कर्मचारी पळून जाण्यात यशस्वी झाले, तरीही त्यांना अपहरणकर्त्यांनी अमानुषपणे मारहाण केली असे चंडोक यांनी सांगितले. बंसरीलाल यांचे कुटुंब दिल्लीत राहते. स्थानिक समुदाय संबंधित अधिकाऱ्यांच्या संपर्कात आहे आणि स्थानिक तपास यंत्रणांनी या संदर्भात गुन्हा दाखल केला आहे. त्यांच्या मित्रांच्या म्हणण्यानुसार बंसरीलालचा शोध घेण्यासाठी दिवसभरात शोध घेण्यात आला असे चंडोक म्हणाले. चंडोक यांनी या प्रकरणाबाबत परराष्ट्र मंत्रालय, भारत सरकारला कळवले आहे आणि यासंदर्भात त्वरित हस्तक्षेप आणि मदतीची विनंती केली आहे.