हैदराबाद : येथील दिशा बलात्कार आणि हत्या प्रकरणातील पोलिस चकमकीत मरण पावलेल्या आरोपींचे दुसऱ्यांदा शवविच्छेदन करण्यात आले. तेलंगणा उच्च न्यायलयाच अदेशानुसार ते करण्यात आले. नवी दिल्लीतून आलेल्या न्याय वैद्यकीय तज्ज्ञांनी सरकारी गांधी रुग्णालयात शवविच्छेदनाची प्रक्रिया पार पाडली.
नवी दिल्लीतील ऑल इंडिया इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्समधून आलेल्या तज्ज्ञांनी ही प्रक्रिया पार पाडली. न्यायालयीन आदेशानुसार त्याचे छायाचित्रण करण्यात आले असून शवविच्छेदन अहवाल आणि छायांकन न्यायालयात सादर करण्यात येईल, असे गांधी रुग्णालयाचे अधिष्ठाता श्रावणकुमार यांनी पत्रकारांना सांगितले. आणखी पाच दिवसात हे मृतदेह पूर्णत: कुजून जातील, असे श्रावणकुमार न्यालयीन साक्षीत सांगितले होते
.
शवविच्छेदन झाल्यावर हे मृतदेह त्यांच्या कुटुंबियांकडे सोपवण्यात आले. नारायणपूर जिल्ह्यातील त्यांच्या मुळगावी मृतदेह नेणार असल्याचे शवविच्छेदनगृहाबाहेर थांबलेल्या नातेवाईकांनी सांगितले. सामाजिक कार्यकर्ते के. सुजय आणि अन्य काही जणांनी या याचिका दाखल केल्या आहेत. महंमद आरिफ (26), जोल्लू शिवा (20), जोल्लू नवीन (20), चिंतकुंतला चेन्नकेशावुलू (वय 20) हे दिशा सामुहिक बलात्कार आणि हत्या प्रकरणातील आरोपी होते. त्यांना शादनगर येथील घटनास्थळी तपासासाठी नेण्यात आले, त्यावेळी त्यांनी पोलिसांकडील शस्त्रे हिसकावून पळून जाण्याचा प्रयत्न केला. त्यावेळी झालेल्या चकमकीत चारही आरोपींचा मृत्यू झाला.
त्यांचा मृत्यू झाला त्याच दिवशी त्यांचे पहिल्यांदा शवविच्छेदन मेहबूबनगर रुग्णालयात करण्यात आले होते. या चकमकीची सामाजिक संघटनांनी न्यायबाह्य हत्या अशी संभावना करून चौकशीची मागणी केली होती. या प्रकरणी सर्वोच्च न्यायलयाने न्याय आयोग नेमून आपला अहवाल देण्यास सहा महिन्यांचा कालावधी दिला आहे. या प्रकरणाची सीबीआय चौकशी करावी. मृतांच्या कुटुंबियांना 50 लाखाची नुकसानभरपाई द्यावी, अशी मागणी करत मृतांचे कटुंबीय सर्वोच्च न्यायलयात गेले होते. त्यावर न्यायालयाने हा आदेश दिला होता.