पुणे – करोनाचा वाढता प्रादुर्भाव, पावसाळ्याचा कालावधी अशा पार्श्वभूमीवर बालभारतीच्या गोदामातून आलेल्या मोफत पाठ्यपुस्तक व स्वाध्यायपुस्तिकांची साठवणूक करण्यासाठी तालुकास्तरावर सुरक्षित इमारतीची निवड करावी करावी लागणार आहे. यासाठी जिल्हा परिषद व महापालिकेच्या प्राथमिक शिक्षणाधिकाऱ्यांना मोठी कसरतच करावी लागणार आहे.
समग्र शिक्षा मधील मोफत पाठ्यपुस्तक योजनेअंतर्गत सन 2020-21 या शैक्षणिक वर्षासाठी पाठ्यपुस्तक व स्वाध्यायपुस्तिकांची बालभारतीचे गोदाम ते तालुका स्तरापर्यंत वाहतूक करण्यासाठी वाहतूकदार संस्थेची निवड करण्यात आलेली आहेत. संबंधित वाहतूकदारामार्फत पुस्तकांची वाहतूक सुरु करण्यात आलेली आहे. पुस्तकांची वाहतूक जलद व योग्यरित्या होणे व पुरवठ्यापश्चात वितरणापर्यंत पाठ्यपुस्तकांची योग्यरित्या साठवणूक होणेकरिता प्राथमिक शिक्षण संचालक दत्तात्रय जगताप यांनी शिक्षणाधिकाऱ्यांना आदेशही जारी केले आहेत.
पुस्तक साठविण्यासाठी करोना हॉटस्पॉट अंतर्गत घोषित केलेल्या भागामधील इमारतीची निवड करणे योग्य ठरणार नाही. इमारतीपर्यंत वाहन सुलभपणे जाईल असा पक्का रस्ता असणे बंधनकारक आहे. पावसाळा जवळ येऊन ठेपलेला असल्याने इमारत मजबूत असावी लागणार आहे. पुस्तके पावसाच्या पाण्यापासून भिजणार नाहीत याची दक्षता घ्यावी लागणार आहे.
इमारतीमधून पाठ्यपुस्तकांची चोरी होणार नाही या दृष्टीने आवश्यक त्या सुरक्षात्मक योजना उपलब्ध असणे गरजेचे आहे. पूराचे पाणी इमारतीपर्यंत पोहचणार नाही याची दक्षता बाळगावी लागणार आहे. करोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी सोशल डिस्टन्सिंगचे पालन करणे आवश्यक आहे. या परिस्थितीत जिल्ह्यातील प्रत्येक पंचायत समिती, महापालिका यांच्याकरिता पुस्तक स्विकारणे व इतर अनुषंगिक प्रशासकीय कामकाजाकरिता शिक्षणाधिकारी यांच्या स्तरावर एका अधिकाऱ्यांची प्रतिनिधी म्हणून नियुक्ती करावी लागणार आहे. पुस्तकांची वाहतूक पूर्ण होईपर्यंत या प्रतिनिधीला बालभारतीच्या गोदामाच्या अतिथीगृहामध्ये राहणे अनिवार्य राहणार आहे.
पाठ्यपुस्तकाची वाहनामधून उतरण करण्याकरीता मजूर गटशिक्षणाधिकारी, प्रशासन अधिकारी यांनी उपलब्ध करुन घ्यावयाचे आहेत. त्यामुळे संबंधित अधिकाऱ्यांनी जिल्ह्याचे प्रतिनिधी व वाहतूकदार संस्थेसोबत समन्वय ठेवून मजूर उपलब्ध करुन घ्यावेत. मजूरांचे मानधन संबंधित अधिकाऱ्यास वाहतूकदार संस्था अदा करणार आहे.
तालुकास्तरावर पाठ्यपुस्तके प्राप्त झाल्यानंतर पुस्तके माध्यम, विषय व वर्ग निहाय स्वतंत्र ठेवण्यात यावेत. त्यामुळे शाळांना पुस्तकाचे वाटप करणे सुलभ होणार आहे. केंद्रप्रमुखामार्फत संबंधित केंद्रातील सर्व शाळांची पुस्तके केंद्र शाळेपर्यंत वितरित करण्याचे नियोजन करावे. केंद्र शाळेमधून संबंधित केंद्रमधील सर्व शाळांमध्ये तात्काळ पाठ्यपुस्तके वितरीत करावी लागणार आहेत. यासाठी सूक्ष्म नियोजन करावे लागणार असून त्याचा अहवाल प्राथमिक शिक्षण संचालनालयास सादर करावे लागणार आहेत, असे आदेशात नमूद करण्यात आलेले आहे.