नवी दिल्ली : ‘आम्ही हिंदुस्थानला घरात घुसून मारले, असे छातीठोकपणे सांगणाऱ्या पाकिस्तानने पुन्हा एकदा घुमजाव केले आहे. पाकिस्तान कधीच दहशतवादाला आश्रय देत नाही असे सांगत पाकिस्तानचे विज्ञान व तंत्रज्ञान मंत्री फवाद चौधरी यांनी पुलवामासंबंधी आपण केलेल्या वक्तव्याचा विपर्यास करण्यात आल्याचा दावा केला आहे.
“पाकिस्तान कोणत्याही प्रकारच्या दहशतवादाला थारा देत नसून, आपल्या वक्तव्याचा चुकीचा अर्थ काढण्यात आला,” असं त्यांनी एका वृत्तसंस्थेशी बोलताना म्हटले आहे. “माझे वक्तव्य स्पष्ट होते. भारताने पाकिस्तानात घुसून बालकोटमध्ये कारवाई केल्यानंतर करण्यात आलेल्या स्विफ्ट रिसॉर्ट ऑपरेशनबद्दल मी बोलत होतो. पुलवामा नंतर पाकिस्तानकडून करण्यात आलेल्या ऑपरेशनबद्दल मी सांगत होतो,” असे त्यांनी म्हटले आहे.
फवाद चौधरी यांनी गुरुवारी जम्मू-काश्मीरमधील पुलवामा येथील २०१९ सालच्या दहशतवादी हल्ल्यासाठी पाकिस्तान जबाबदार होता, अशी खळबळजनक कबुली दिली होती. केंद्रीय राखीव पोलीस दलाच्या (सीआरपीएफ) ४० जवानांचा बळी घेणाऱ्या या हल्ल्यामुळे दोन्ही देशांनी युद्धाच्या उंबरठय़ावर आणून ठेवले होते. ‘आम्ही हिंदुस्थानला घरात घुसून मारले.
पुलवामातील आमचे यश हे इम्रान खान यांच्या नेतृत्वाखालील या देशाचे यश आहे. तुम्ही-आम्ही सर्वजण या यशाचा भाग आहोत’, असे फवाद चौधरी यांनी नॅशनल असेम्ब्लीतील चर्चेदरम्यान सांगितले. मात्र वक्तव्यावरुन टीका होऊ लागल्यानंतर फवाद चौधरी यांनी यु-टर्न घेतल्याचे दिसत आहे. आपण पुलवामा झाल्यानंतर भारताला जेव्हा आम्ही घऱात घुसून मारले असे सांगत सावरण्याचा प्रयत्न केला आहे. आपण दहशतवादाचा निषेध करत असून निर्दोषांची हत्या करत नाही असे ते म्हणाले आहेत.
भारत हल्ला करेल या भीतीनेच पाकिस्तानने भारतीय हवाई दलाचे वैमानिक अभिनंदन वर्धमान यांची सुटका केली, असे वक्तव्य पाकिस्तान मुस्लीम लीग- नवाझ (पीएमएल) पक्षाचे नेते अयाझ सादिक यांनी सांगितल्याच्या दुसऱ्याच दिवशी, पंतप्रधान इम्रान खान यांचे जवळचे सहकारी असलेले चौधरी यांनी हे कबुलीदर्शक विधान केलं. पुलवामा हल्ल्याच्या वेळी माहिती व तंत्रज्ञान मंत्री असलेले चौधरी यांनी सादिक यांचं वक्तव्य ‘अयोग्य’ असल्याचे सांगून त्यावर टीका केली.