जनसुनावणीचा अहवाल मुंबईत प्रकाशित
मुंबई : मंगळुरू पोलिसांच्या बेजबाबदार वर्तुणुकीनेच दक्षिण कन्नड जिल्ह्यात प्रबंधात्मक आदेश मोडले गेले. त्यावर पोलिसानी केलेली कारवाई अनावश्यक आणि प्रक्षोभक होती. प्रभावी संवादाच्या अभावाने असंतोष भडकला, त्याचा परिणाम जिवित आणि वित्तहानीत झाल्याचा ठपका सर्वोच्च न्यायालयाचे न्यायमुर्ती (निवृत्त) व्ही. गोपाळगौडा यांच्या नेतृत्वाखाली झालेल्या जनसुनावणीत ठेवण्यात आला.
गौडा यांच्यासह ऍड. बी. टी. व्यंकटेश आणि ज्येष्ठ पत्रकार सुगाता श्रीनिवासराजू यांचा या जनसुनावणीत समावेश होता. त्यांनी सहा आणि सात जानेवारीला मंगळुरू येथे जाऊन पाहणी करून आपला अहवाल मांडला. सुधारीत नागरीकत्व कायद्याच्या विरोधात (का) 19 डिसेंबरला निदर्शने करण्यासाठी शहर पोलिसांनी सुरवातीला परवानगी दिली. मात्र आदल्या दिवशी सायंकाळी घाईने ती रद्द करण्यात आली. त्यामुळे गोंधळ निर्माण झाला. जमावाला हाताळण्यासंदर्भात सर्वोच्च न्यायलयाच्या सुचना आणि पोलिस आचारसंहितेचे पालन करून पुरेशा आणि योग्य उपाय योजना केल्या असत्या तर ही अनुचित घटना टाळता आली असती, असे निरीक्षण या जनसुनावणीत नोंदवण्यात आले.
जनसुनावणीने घेतलेल्या अन्य लोकांच्या मुलाखतींसह या घटनेचे वार्तांकन करताना झालेल्या निर्घृण हल्ल्यात जखमी झालेल्या मुस्लिम समाजातील दोन पत्रकारांच्या जबाबावर हा 31 पानी अहवाल आधारला आहे. या प्रकाराचे छायाचित्रण करणाऱ्या इस्माईल शाओरेझ आणि अफनान यांना पोलिसंनी बेदम मारहाण केली. पोलिसांच्या अतिरेकी वर्तनाच्या अनेक खुणा या शहरात आढळतात, असे या अहवालात म्हटले आहे.
या सुनावणीसाठी पोलिसांनाही निमंत्रीत करण्यात आले होते. मात्र ते त्याकडे फिरकलेच नाहीत. पोलिसांच्या गोळीबारात अब्दूल जलील आणि नौशीन कुद्रोळी हे दोघे मरण पावले होते. या गोळीबाराचे वर्णन प्रत्यक्षदर्शी आणि मृतांच्या नातेवाईकांनी अंधाधूंद असे केले होते. या घटनेच्या छायांकनातही हे आंदोलन हाताळताना पोलिसांची धार्मिक दृष्टीकोन उघड करणारा आहे. एका व्हिडिओमध्ये पोलिस अधिकारी गोळीबारात कमी लोक मेल्याबद्दल कनिष्ठ अधिकाऱ्याला झापत असल्याचे दिसत आहे, असे यात नमूद केले आहे.
या सुनावणीचवेळी अनेक प्रत्यक्षदर्शींनी पोलिस आपल्याला लक्ष्य बनवतील अशी भीती व्यक्त केली. कोणतीही अनुचित घटना घडली नसतानाही पोलिसांनी लाठीमार सुरू केला. यातील जखमी आणि त्यांच्या नातेवाईकांनी निदर्शनाशी कोणताही संबंध नसताना आपल्याला लक्ष्य बनवल्याचे जबाब नोंदवल्याचे या अहवालात म्हटले आहे.