नवी दिल्ली : देशाच्या इतिहासात पुन्हा एकदा भाजपने गुजरातमध्ये ऐतिहासिक विजय मिळवला. या निवडणुकीत पुन्हा एकदा काँग्रेसची वाताहत झाल्याचे पाहायला मिळाले. त्यामुळे काँग्रेसला नव्याने आत्मचिंतनाची गरज झाल्याचे म्हटले जात आहे. त्यातच आता काँग्रेसवर भाजपविरोधी पक्षांनी देखील निशाणा साधण्यास सुरुवात केली आहे. तृणमूल काँग्रेसने (टीएमसी) काँग्रेसवर टीका करताना आगामी २०२४ च्या लोकसभा निवडणुकीत पक्षाच्या क्षमतेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले.
तृणमूल काँग्रेस पक्षाचे प्रवक्ते कुणाल घोष यांनी काँग्रेसच्या निवडणुकीतील कामगिरीवर भाष्य करताना, गुजरात निवडणुकीतील पराभवानंतर काँग्रेसने आत्मपरीक्षण करण्याची गरज आहे. गुजरातमध्ये काँग्रेस लढतानाच दिसला नाही. खरं पाहता या निडवणुकीच्या माध्यमातून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या होम पीचवर विजय मिळवून स्वतःला सिद्ध करण्याची ही उत्तम संधी होती. मात्र काँग्रेसने ही देखील संधी गमावली असल्याचे घोष यांनी सांगितले.
पुढे बोलताना, घोष यांनी,”जो पक्ष स्वतःचा सन्मान राखू शकला नाही, तो २०२४ ची निवडणूक काय जिकणार?” असा परखड सवाल देखील यावेळी उपस्थित केला. तसेच आगामी लोकसभा निवडणूक लढण्यास काँग्रेस सक्षम नसल्याचा आरोप देखील यावेळी त्यांनी केला. त्याचबरोबर तृणमूल काँग्रेसच भाजपला पर्याय असून गुजरात निवडणुकीने हे पुन्हा एकदा सिद्ध झाल्याचे घोष यांनी म्हटले.
दरम्यान, गुजरात विधानसभा निवडणुकीत एकूण 182 जागांपैकी भाजपने 156 जागा जिंकल्या आहेत, तर काँग्रेस 17 जागांवर घसरली आहे. राज्याच्या इतिहासातील पक्षाची ही सर्वात वाईट कामगिरी असल्याचे सांगण्यात येत आहे.