जम्मू -देशाच्या राजकारणात कॉंग्रेसला कुठला पर्याय नाही. कॉंग्रेसचा समावेश नसलेली कुठलीच आघाडी भाजपशी लढू शकत नाही आणि त्या पक्षाचा पराभवही करू शकत नाही, अशी भूमिका जम्मू-काश्मीरच्या माजी मुख्यमंत्री मेहबूबा मुफ्ती यांनी मंगळवारी मांडली.
तेलंगणचे मुख्यमंत्री के.चंद्रशेखर राव यांनी राष्ट्रीय पातळीवर भाजपविरोधी आघाडी स्थापन करण्याच्या हालचाली सुरू केल्या आहेत.
कॉंग्रेसला बाजूला ठेऊन आघाडी बनवण्याचे त्यांचे प्रयत्न असल्याची चर्चा आहे. त्यावर मेहबूबा यांनी येथे पत्रकारांशी बोलताना प्रतिक्रिया दिली. देशाच्या उभारणीत कॉंग्रेसचे मोठे योगदान आहे. केंद्रातील याआधीच्या सरकारांनी जे उभे केले; तेच विकण्याचे काम आताचे भाजप सरकार करत आहे.
सरकार जे काही करत आहे; ते देशहिताच्या विरोधात आहे. देशाच्या हितासाठी ते सरकार सत्तेवरून घालवण्याची गरज आहे. भाजपशी लढण्यासाठी सर्वच विरोधी पक्षांनी एकत्र यावे, असे आवाहन त्यांनी केले. इतरही काही विरोधी पक्षांनी याआधी कॉंग्रेसशिवाय आघाडी राजकीयदृष्ट्या व्यवहार्य ठरणार नसल्याचे मत व्यक्त केले आहे.