नवी दिल्ली – करोनाच्या संकटात भारतीय नागरिक देत असलेल्या लढ्याला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी रविवारी सलाम केला. संकटाच्या काळात भारताने जगाला आपल्या संस्कृतीचे नव्याने दर्शन घडवले. त्यामुळेच आज भारताचे जगभर आभार मानले जात आहेत, असे मोदी म्हणाले. केरोनामुळे देश ठप्प झाला आहे. करोनाला नियंत्रणात आणण्यासाठी केंद्र सरकारनं देशात लॉकडाऊन लागू केला. लॉकडाऊनच्या काळात सर्वच यंत्रणा युद्धपातळीवर लढत आहे. या पार्श्वभूमीवर पंतप्रधान मोदी यांनी “मन की बात’ या आकाशवाणीवरील कार्यक्रमातून देशवासीयांशी संवाद साधला.
मोदी म्हणाले की, संपूर्ण जग साथरोगाच्याविरोधात एकवटले आहे. जेव्हा भविष्यात याची चर्चा होईल, तेव्हा भारतातील जनतेने याला कसे तोंड दिले, त्याची दखल घेतली जाईल. लॉकडाऊनच्या काळात देश कसा एकजूट झाला. लॉकडाऊनच्या काळात प्रत्येकजण आपापल्या परीने लढत आहे. सफाई कर्मचाऱ्यांपासून ते पोलिसांपर्यत सगळ्यांचा जनतेच्या मनातील आदर वाढला आहे. कोरोनाच्या काळात सगळेच झोकून देऊन काम करत आहेत. त्यामुळेच स्वच्छता ठेवणाऱ्यांवर नागरिकांकडून पुष्पवृष्टी होताना दिसत आहे. कोणी घरभाडे माफ करतो, कोणी किराणा देतो. शेतकरी शेतात रात्रंदिवस मेहनत करून देशात कुणीही उपाशी झोपणार नाही, याची काळजी घेत आहे. कोणी पेन्शन देते, कोणी शेकडो गरिबांना मोफत जेवण देत आहे. दुसऱ्यांच्या मदतीसाठी तुमच्या मनात असलेला भाव या लढाईला बळ देत आहे. “स्वच्छ भारत अभियाना’पासून ते गॅस सबसिडी सोडण्यापर्यंत ही भावना दिसून आली. देशवासीयांच्या या भावनेला मी नमन करतो, असे म्हणत मोदी यांनी सामाजिक कार्यात पुढे आलेल्यांचे आभार मानले.
देशातील प्रत्येक नागरिक साथरोगाविरोधातील या लढाईचा शिपाई आहे. तसेच या लढाईचे नेतृत्व करत आहे. भारतातील कोरोनाविरोधातील लढाई ही जनातकेंद्रीत आहे. संपूर्ण देशात गल्लीबोळात लोक एकमेकांना मदत करत आहेत. जनतेसोबत शासन-प्रशासनही लढत आहे, असे मोदी म्हणाले.
कठीण काळ आपल्याला नक्कीच काही ना काहीतरी शिकवून जात असतो. काही शक्यतांचे मार्ग दर्शवतो तर काही नव्या दिशा दाखवतो. आजच्या या कठीण काळात तुम्ही सर्व देशवासियांनी जी संकल्प शक्ती दाखवली आहे. त्यामुळे भारतात नव्या बदलांना सुरुवात देखील झाली असल्याचेही ते म्हणाले. स्थानिक प्रशासन, राज्य सरकारे ज्या जबाबदारीचे पालन करत आहेत, त्यांची करोनाविरोधातल्या लढ्यात खूप मोठी भूमिका आहे. त्यांचे हे परिश्रम अत्यंत प्रशंसनीय आहेत. आज, देशाच्या कानाकोपऱ्यातून लोक स्वच्छता कामगारांवर पुष्पवर्षाव करत असल्याची छायाचित्रे येत आहेत. डॉक्टर असो, पोलिस असो, व्यवस्थेबद्दलही सामान्य लोकांच्या मानसिकतेत मोठे परिवर्तन घडले आहे. पोलिसिंगची मानवीय आणि संवेदनशील बाजू आमच्यासमोर आली आहे, असे पंतप्रधान मोदी यांनी यावेळी सांगितले.
डिजिटल प्लॅटफॉर्मची निर्मिती
नागरिकांना त्यांच्या इच्छेनुसार आवडीनुसार करोनाविरोधातील लढ्यात सहभागी होता यावे यासाठी सरकारकडून covidwarriors.gov.in या नावाने डिजिटल प्लॅटफॉर्मची निर्मिती करण्यात आल्याचे पंतप्रधानांनी यावेळी सांगितले. देशभरातील नागरिकांना त्यांनी या डिजिटल प्लॅटफॉर्मशी जुळवून घेत देशाची सेवा करण्याचे आवाहन केले आहे. सरकारने या प्लॅटफॉर्मच्या माध्यमातून असंख्य सामाजिक संस्थांचे प्रतिनधी, सिव्हिल सोसायटीचे प्रतिनिधी व स्थानिक प्रशासनास एकमेकांशी जोडले आहे. अत्यंत कमी वेळात या पोर्टलशी सव्वाकोटी नागरिक जोडले गेले आहेत. डॉक्टर्स परिचारिकांसह आशा स्वयंसेविका, एनसीसी व एनएसएसचे सहकारी तसेच विविध क्षेत्रातील अनेकजणांनी या प्लॅटफॉर्मला आपला प्लॅटफार्म बनवले आहे. हे लोक स्थानिक स्तरावर आपत्कालीन परिस्थिती व्यवस्थापन करण्याचे नियोजन करणाऱ्यांमध्ये व त्याची पुर्तता करण्यात खूप मदत करत आहेत.