लखनौ – हाथरस सामूहिक बलात्कार प्रकरणातील मुख्य आरोपी संदीप ठाकूर याने हाथरस पोलिसांना लिहिलेल्या पत्रात आपल्याला व इतर तीन आरोपींना या प्रकरणात गोवलं जात असल्याचा आरोप केला आहे. पत्राद्वारे त्याने पीडितेची आई व तिच्या भावाने आपली छळवणूक केल्याचंही म्हटलंय.
उत्तर प्रदेशातील हाथरस जिल्ह्यात १४ सप्टेंबर रोजी कथित सामूहिक बलात्कार प्रकरण घडलं होत. यातील पीडितेचा दिल्ली येथील एका रुग्णालयामध्ये उपचारांदरम्यान मृत्यू झाला होता. या प्रकरणात आतापर्यंत चार आरोपींना अटक करण्यात आली आहे. असं असलं तरी या प्रकरणाला रोज नवं वळण मिळताना दिसत आहे.
अशातच मुख्य आरोपी संदीप ठाकूर याने बुधवारी हाथरस पोलिसांना पत्र लिहीत प्रकरणात गोवलं जात असल्याचा आरोप केला आहे. या पत्रामध्ये त्याने सर्व आरोपींना न्याय मिळावा अशीही मागणी केली आहे.
पत्राद्वारे संदीप ठाकूरने केलेले दावे
– पीडितेशी आपले मैत्रीचे संबंध असल्याचा संदीपचा दावा
– पीडितेशी कधी-कधी भेट व फोनद्वारे संभाषण होत असे
– पीडितेचे कुटुंबीय आरोपी-पिडीतेतील मैत्रीच्या नात्यावर नाखूष असल्याचा आरोप
– घटनेच्या दिवशी पीडितेला भेटण्यासाठी शेतात गेलो होतो
– पीडितेचे आई व भाऊ तिथं असल्याने त्यांनी हटकलं व आपण परत आलो
– पीडितेला कुटुंबियांकडून गंभीर मारहाण झाल्याचं गावकऱ्यांकडून समजलं
– पीडितेच्या कुटुंबीयांनी माझ्यासह अन्य तिघांना खोटे आरोप करत सामूहिक बलात्कार प्रकरणात अडकवलं
दरम्यान, उत्तर प्रदेश पोलिसांनी देखील पीडितेचे कुटुंबीय एका आरोपीस ओळखत असल्याचे पुरावे हाती लागल्याचं म्हंटलं आहे. पोलिसांनी प्राप्त कॉल रेकॉर्ड्सवरून पीडितेच्या भाऊ व संदीप ठाकूर एकमेकांच्या संपर्कात असल्याचा दावा केला आहे. दोघांमध्ये गतवर्षी ऑक्टोबरपासून या वर्षी मार्चपर्यंत १४ वेळा फोनवर संभाषण झाल्याचं म्हटलंय.