मुंबई – पक्षबांधणीसाठी राज्यभर दौऱ्यावर असलेल्या माजी मंत्री आणि युवासेनाप्रमुख आदित्य ठाकरे यांनी थेट मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना राजीनामा देऊन त्यांच्याविरोधात वरळीमधून निवडणूक लढण्याचे चॅलेंज दिले होते. मुख्यमंत्री शिंदेंनी देखील ठाकरेंच्या या आव्हानाला प्रत्युत्तर दिले मात्र त्यांनी हे आव्हान स्वीकारलं नाही. आता पुन्हा एकदा आदित्य ठाकरेंनी मुख्यमंत्र्यांना नवीन आव्हान दिल आहे. हे आव्हान राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्याबाबत आहे.
आदित्य ठाकरे सध्या शिवसैनिकांच्या गाठीभेटी घेताहेत. यादरम्यान शिंदे गटातील आमदारांसह मुख्यमंत्री शिंदेंवर ठाकरे निशाणा साधताहेत. राज्याच्या अधिवेशनापूर्वीच राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांना राज्यपाल पदावरून हटवून दाखवा, असं नवीन चॅलेंज आता आदित्य ठाकरेंनी मुख्यमंत्री शिंदेंना दिलं आहे.
गेल्या काही दिवसांपासून राज्यपाल भगतसिंह कोश्यारी वादग्रस्त विधानांमुळे चांगलेच चर्चेत आहेत. अशात त्यांना पदावर राहण्याची इच्छा नसल्याचे देखील बोलले जात आहे. यावरूनच आदित्य ठाकरेंनी थेट मुख्यमंत्र्यांना लक्ष केले . राज्यपालांना बदलून दाखवा असं चॅलेंज आदित्य ठाकरेंनी मुख्यमंत्र्यांना दिल आहे.
यावेळी आदित्य ठाकरे म्हणाले, “वरळीतून लढून दाखवण्याचं मी काल सुद्धा मुख्यमंत्र्यांना आव्हान दिलं आहे. वरळीतून नाही तर ठाण्यातून तरी लढून दाखवा असं मी त्यांना सांगितलं. मी त्यांना आणखी एक चॅलेंज देतो. त्यांची माझ्या विरोधात लढण्याची हिंमत किंवा ताकद नसेल तर येत्या अधिवेशनात राज्यपालांचं भाषण होण्याऐवजी महाराष्ट्र द्वेष्ट्या राज्यपालांना बदलून दाखवाव” असं चॅलेंज आदित्य ठाकरेंनी मुख्यमंत्र्यांना दिले.