पुणे – देशात साखर उत्पादनावर महाराष्ट्राचे प्रभुत्व ठेवण्यासाठी मांजरी येथील वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूट (व्हीएसआय) याठिकाणी उसाची एक नवी जात विकसित केली जात आहे. रिकव्हरीचे प्रमाण चांगले असल्याने उत्पादनामध्ये भरीव वाढ होऊन, त्याचा फायदा शेतकऱ्यांना होणार आहे. पर्यायाने राज्याच्या साखर उत्पादनातही वाढ होणार आहे.
साखर उद्योग हा महाराष्ट्रातील एक महत्त्वाचा शेती उद्योग आहे. ऊस हे महाराष्ट्रातील शेतकऱ्यांचे नगदी पीक आहे. शेतीमधून मिळणाऱ्या इतर पिकांच्या उत्पादनाशी उस पिकाची तुलना केली तर, उस पीक हे एक शाश्वत उत्त्पन्न देणारे, बाजारात सहजतेने विक्री होणारे आणि विक्री मूल्याची हमी असणारे पीक आहे. या पिकाच्या आर्थिक उलाढालीचा महाराष्ट्राच्या एकूण ग्रामीण जीवनावर लक्षणीय बदल होत आहे.
महाराष्ट्राची भौगोलिक परिस्थिती ऊस लागवडीस अनुकूल आहे. त्यासाठी साखर उत्पादनात आपले प्रभुत्व कायम राहावे यासाठी महाराष्ट्र उसाच्या नव्या जाती विकसित करण्याचा प्रयत्न करत आहे.