ओंकार दळवी
जामखेड – तालुक्यातील पिंपळगाव आळवा येथील युवा शेतकरी विक्रांत परमेश्वर गायकवाड या युवा शेतकऱ्याने केवळ 60 गुंठे क्षेत्रात सेंद्रिय पद्धतीने पेरूच्या रोपांची लागवड केली. कुठल्याही रासायनिक खतांचा व कीटकनाशकांचा वापर न करता सेंद्रिय पद्धतीने पेरूची बाग बहरली असून, पेरूच्या पहिल्या तोड्यातच एक लाख रुपयांपर्यंतच्या उत्पन्नाकडे वाटचाल सुरू आहे. व्यापाऱ्याला माल न देता थेट शेतकरी ते ग्राहक पद्धत वापरल्याने नफ्यात वाढ झाली आहे. उत्पादन व गुणवत्ता यात सातत्य ठेवत प्रयोगशीलता जपली. त्यातून कुटुंबाला आर्थिक स्थैर्य दिलेच.
तालुक्यातील पिंपळगाव आळवा येथील युवा शेतकरी विक्रांत गायकवाड यांची वडिलोपार्जित 4 एकर शेती असून, यापैकी 60 गुंठे क्षेत्रात सेंद्रिय पद्धतीने पेरूच्या रोपांची लागवड केली. सध्या पेरूची तोडणी सुरू झाली आहे. बाजारपेठेत प्रतिकिलो 50 ते 60 रुपये दर मिळत आहे. यातून एक लाख रुपये निव्वळ उत्पन्न मिळेल, असा त्यांना विश्वास आहे.
गायकवाड यांनी आपल्या 60 गुंठे क्षेत्रात 15 बाय 15 च्या अंतरावर तैवान पीक जातीच्या सुमारे 1 हजार 680 रोपांची लागवड जुलै 2021ला केली. रासायनिक खते व कीटकनाशकांचा वापर करायचा नाही, असा त्यांनी निर्धार केला होता. त्यानुसार रासायनिक खतांना फाटा देत सेंद्रिय खताचा वापर केला. त्याला जीवामृत, शेणखत, गोमूत्र फवारणी, योग्य मशागत, खत, वेळेवर पाणी, नियोजनपूर्वक छाटणी व शेंडा मारणे आदी कामे केली आहेत. सध्या पेरू तोडणीला आले आहेत. 90 टक्के गर व 10 टक्केच बी असे असलेले चांगले निरोगी फळ तयार झाले आहे.
आणखी महिनाभर या बागेतील पेरू नागरिकांना उपलब्ध होणार आहेत. आजवर दहा क्विंटल पेरू निघाले आहेत. प्रतिकिलो 50 ते 60 रुपये दर मिळत आहे. या माध्यमातून आजवर 50 हजार रुपये उत्पन्न हाती पडले आहे. 60 गुंठे क्षेत्रातून आणखी किमान दहा क्विंटल पेरू निघतील. स्थानिक बाजारपेठेतील सध्याचा दर कायम राहिल्यास गायकवाड यांना खर्च वजा जाता किमान एक लाख रुपये निव्वळ उत्पन्न मिळेल, असा दावा गायकवाड यांनी केला आहे. इतर तरुणांनी नोकरीच्या मागे न लागता शेतीकडे वळावे, असे आवाहन त्यांनी केले आहे.
साठ गुंठे क्षेत्रात पेरूची बाग फुलवली आहे. कुठल्याही रासायनिक खतांचा वापर केला नाही. सेंद्रिय खतांच्या जोरावर ही बाग फुलवली आहे. कुठल्याही केमिकलचा वापर केला नसल्याने पेरूला मागणी अधिक होत आहे.
विक्रांत गायकवाड,
पेरू उत्पादक शेतकरी
उच्चशिक्षितांचा सेंद्रिय शेतीकडे कल
रासायनिक खतांचे अनेक दुष्परिणाम समोर येऊ लागल्यानंतर आता प्रयोगशील शेतकरी सेंद्रिय शेतीकडे वळू लागले आहेत. सेंद्रिय शेतीतून निघणाऱ्या फळे व भाज्यांना बाजारपेठेत चांगला दर मिळत आहे. इच्छाशक्ती आणि चिकाटी असेल आणि त्या दिशेने प्रयत्न केले, तर यश मिळण्यास अडचण येत नाही. ही बाब लक्षात घेऊन उच्चशिक्षित तरुण सेंद्रिय शेतीकडे वळू लागले आहेत.