नारायण ढेबे
स्वातंत्र्य मिळाल्यानंतर भारताने अलिप्ततावादाचे धोरण स्वीकारले. याचा प्रमुख हेतू असा होता की, भारत शांततेच्या मार्गावरून पुढील वाटचालीस सज्ज झाला होता. हाच शांततेचा संदेश संपूर्ण जगाला देत भारत आज शांतीदूत बनला आहे, असे वाटते.
भारताने दुसऱ्या महायुद्धानंतर संपूर्ण जगाला शांतीचा संदेश देत कोणत्याही राष्ट्रांमध्ये पक्षपाती भूमिका न घेता शांतता हाच आपला पक्ष म्हणून संपूर्ण जगाच्या कल्याणाचा, शांतीचा, सुखाचा मार्ग पत्करला होता. त्यामुळे अनेक वेळेला निर्माण झालेल्या युद्ध किंवा आपत्तीच्या वेळी जगाला सावरण्याचा आणि आपली प्रगती करण्याचा सुखाचा महामार्ग भारताने जगाला दिलेला आहे.
1893 साली सर्वधर्मीय परिषदेमध्ये स्वामी विवेकानंद यांनी जे भाषण जगासमोर केले होते त्याची आठवण आज संपूर्ण भारतातील जनतेला होत आहे. ते म्हणाले होते की, “माझा भारत देश शंभर वर्षांनंतर संपूर्ण जगाचे सारथ्य करेल आणि माझ्या देशातील विविधता, बुद्धिमत्ता याचा संपूर्ण जगाला फायदा होईल आणि त्यामुळेच जग हे वेगळ्या दिशेने चालू लागेल.
याचाच अर्थ असा की, माझी भारतमाता जगाचे सारथ्य करेल, आज खरं पाहिलं तर ती वेळ आलेली आहे. जगात आजच्या परिस्थितीला कोणालाही युद्ध करावेसे वाटत नाही, किंबहुना तशी परिस्थिती नाही. कारण युद्धामुळे होणारी नाहक हानी जगाच्या प्रगतीमध्ये फार मोठा अडथळा निर्माण होईल.
त्यामुळे ते कोणत्याही देशाला परवडणारे नाही. म्हणूनच गेल्या 73 वर्षांपासून भारत देश हा जगाला शांततेचा संदेश देत आहे.
जेव्हा जेव्हा शांततेचा विषय निर्माण होतो तेव्हा तेव्हा भारत हा शांततेचा पुरस्कार करतो. याचे कारण म्हणजे भारताने शांततेच्या मार्गाने, प्रेमाच्या मार्गाने जग जिंकायचे असाच मूलगामी मंत्र जगाला दिलेला आहे.
भारत हा प्रत्येक देशाला आपला मित्र बनवणे आणि त्याला मदत करणे, आंतरराष्ट्रीय पातळीवर देवाण-घेवाण वाढवत आहे. यामुळे जागतिक पातळीवर शांतता प्रस्थापित होण्यासाठी मदत होत आहे.
आजही भारत आपल्या सभोवताली असणाऱ्या राष्ट्रांना तेच सांगण्याचा प्रयत्न करत आहे. पाकिस्तान, चीन, नेपाळ यासारख्या राष्ट्रांना शांत राहण्याचा सल्ला देत आहे. एक मात्र भूमिका भारताने नेहमीच घेतली आहे ती म्हणजे, जर कोणीही आमच्यावर आक्रमण करणार असेल किंवा आमच्यामध्ये असणारी शांतता म्हणजेच कमजोरी असे जर कोणी समजत असेल तर मात्र त्याला सडेतोड उत्तर देण्यासही भारत मागे पुढे पाहात नाही. यामुळे गेल्या 73 वर्षांमध्ये भारतावर झालेली आक्रमणे भारताने अतिशय शांतपणे परतवून लावली आहेत.
स्वसंरक्षण खूपच महत्त्वाचे असते आणि ते भारत नेहमीच करत आला आहे. याशिवाय कोणत्याही अतिलालसेपोटी केलेली आक्रमणे याला भारत कदापिही खतपाणी घालत नाही.
याचेच ज्वलंत उदाहरण म्हणजे काश्मीरप्रश्न होय.
पाकिस्तानसारख्या शेजारील राष्ट्राने जेव्हा-जेव्हा भारताला त्रास दिला आहे किंवा भारताचा भाग बळकावण्याचा प्रयत्न केला आहे तेव्हा तेव्हा भारताने चोख प्रत्युत्तर देत शांततेने आपली भूमिका स्पष्ट केली आहे. तसेच चीनसारख्या देशांनी आपल्या विरोधात कारवाया केल्यानंतर त्यालाही शांततेने प्रत्युत्तर दिले आहे.
अनेक वेळेला निर्माण झालेले वाद हे शांततेने आणि प्रेमाने सोडवण्याचा प्रयत्न भारताने नेहमी केला आहे; परंतु जर कोणी भविष्यात आपल्याला त्रास देण्याचा प्रयत्न करेल तेव्हा भारत पुन्हा उठून उभा राहील आणि प्रत्युत्तर देईल हे मात्र खरे आहे. असे असले तरी भारताला शांततेच्या मार्गाने राहणे आणि जग एक मोठे कुटुंब आहे आणि या कुटुंबामध्ये गुण्यागोविंदाने आणि आनंदाने राहणेच भारत पसंत करील.
भविष्यामध्ये प्रत्येक राष्ट्राने शांत राहावे, सुखी राहावे, समाधानी राहावे आणि चांगल्या प्रकारे आपली प्रगती ही सुख, शांती, सलोखा, मित्रता या गोष्टी अंगी बाळगून राहिल्यास परिणामी अतिशय वेगाने जगाची प्रगती होईल. त्याचप्रमाणे मित्रत्व निर्माण होऊन एकमेकांबद्दल आदर निर्माण होईल आणि त्यातूनच अनेक देशांना एकमेकांची मदत होईल.
याशिवाय प्रत्येक देशांमध्ये असणारी गरिबी, भूकबळी, आरोग्य, रोजगार, निवारा, अन्न, वस्त्र, पाणी, रस्ते, शिक्षण यांसारख्या मूलभूत गरजांवर लक्ष केंद्रित करून प्रत्येक देश यशाचे शिखर गाठेल आणि आपली प्रगती करून घेईल आणि यामध्ये भारत देश हा संपूर्ण जगाच्या पुढे असेल तो याकामी जगाचे सारथ्य करेले.
भारताचे माजी राष्ट्रपती डॉ. अब्दुल कलाम यांनी भारताला “ट्वेंटी-ट्वेंटी’चे स्वप्न दाखवले आहे. त्याचा अर्थ हाच आहे की आता भारत जगाच्या पुढे चालून जगाच्या चालण्याची दिशा ठरवणार आहे. आता खऱ्या अर्थाने जगाची वाटचाल वेगळ्या दिशेने सुरू झाली आहे, असे वाटते. कारण आता जगण्याची सगळीच गणिते दिवसेंदिवस बदलत आहेत, हे करोनासारख्या महामारीने प्रत्येक देशाच्या लक्षात आणून दिले आहे.
मानवाच्या गरजा बदलत आहेत. प्रत्येक देशाला आपला विकास, आपली प्रगती करावी यादृष्टीने पावले टाकायची आहेत.
आता “युद्ध नको, प्रगती हवी’ असाच मंत्र संपूर्ण जगाला द्यायचा आहे. तो देत असताना भारत हा मार्गदर्शक ठरणार आहे. तेव्हा जगातल्या प्रत्येक राष्ट्राने शांततेने आणि बुद्ध नीतीने जगणे ठरवले तर प्रगती लवकर होईल आणि जग जसे आता इंटरनेटच्या माध्यमातून जवळ आले आहे तसेच ते मानवी मनाच्या माध्यमातून एकमेकांशी जोडले जाईल.