बारामती – राज्यातील सेंद्रिय व विषमुक्त शेतीचा सर्वांगीण विकास होण्यासाठी कृषी, सहकार व पणन मंत्री तसेच वरिष्ठ अधिकाऱ्यांबरोबर लवकरच बैठक घेणार असून करोनाची परिस्थिती नियंत्रणात आल्यानंतर याबाबत चर्चा करणार असल्याचे आश्वासन माजी केंद्रीय कृषिमंत्री शरद पवार यांनी दिले. महा ऑरगनिक ऍन्ड रेश्युड्युफ्री फार्मर्स असोशिएशन (मोर्फा) चे अध्यक्ष कृषिभूषण अंकुश पडवळे व सचिव प्रल्हाद वरे यांनी ही माहिती दिली.
बारामती येथे गोविंदबागेत (दि.2) पवार यांनी सेंद्रिय व विषमुक्त शेतीबाबत बैठक आयोजित केली होती. त्यावेळी पवार यांनी हा निर्णय घेतल्याचे पडवळे व वरे यांनी सांगितले. यावेळी आमदार सतीश चव्हाण, माजी आमदार अमरसिंह पंडित, सदाशिव सातव, मोर्फाचे अध्यक्ष कृषिभूषण अंकुश पडवळे, सचिव प्रल्हाद वरे, संचालक अमरजित जगताप, विजय तावरे, रोहित अहिवळे उपस्थित होते.
राज्यात सेंद्रिय व विषमुक्त शेतीला मोठा वाव असून त्यादृष्टीने राज्य सरकारचे धोरण बनावे व सेंद्रिय, विषमुक्त शेतीमालाला किफायतशीर मार्केट मिळावे, याबाबत राज्य सरकारने पुढाकार घ्यावा, याचे सादरीकरण पडवळे यांनी केले.
उत्पादनांच्या मार्केटिंगसाठी कृषी, सहकार व पणन विभागाची महत्त्वाची भूमिका आहे. तिन्हीही विभागाची मदत घेऊन नवीन धोरण बनविण्याबाबत चर्चा झाली. मोर्फाचे सचिव प्रल्हाद वरे यांनी निर्यातक्षम भाजीपाला व फळांचे क्लस्टर राज्य सरकारने बनवून शेतकरी कंपन्यांना लवकर मदत मिळणे गरजेचे असल्याचे सांगितले.
शेतकरी व ग्राहक यांच्यात दुवा साधावा
राज्यात सेंद्रिय व विषमुक्त तांत्रिक दृष्टीने परिपूर्ण शेती अनेक शेतकरी करीत आहेत .पण त्यांना त्याचे मार्केटिंग जमत नाही. ग्राहकांमध्ये अशा उत्पादनांबाबत विश्वास निर्माण करण्यासाठी शेतकरी व ग्राहक यांच्यात दुवा साधण्याचे काम राज्य सरकारने करावे, अशी मागणी यावेळी पवार यांच्याकडे करण्यात आली.