पुणे – कर्नाटकमधील साखर कारखाने आपला गळीत हंगाम दिवाळीपूर्वीच सुरू करण्याच्या तयारीत असून त्याकरिता सीमेलगतच्या दक्षिण महाराष्ट्रातील ऊस शेतीवर नजर ठेवून आहेत. त्यामुळे महाराष्ट्रातील साखर कारखान्यांना त्याचा फटका बसण्याची शक्यता आहे.
पश्चिम महाराष्ट्रातील सातारा, सांगली व कोल्हापूर हा प्रदेश साखरपट्टा म्हणून ओळखला जातो. यापैकी सांगली व कोल्हापूर जिल्ह्यांची सीमा कर्नाटक राज्याला लागून आहे. या जिल्ह्यांना बसलेल्या पूराच्या फटक्याने ऊस पिकाची हानी झाली आहे. या दोन्ही जिल्ह्यांमधील शेकडो एकर ऊस पाण्यामुळे खराब झाला आहे. यापेक्षा अधिक काळ ऊस शेतात ठेवल्यास हे पीक हातचे जाण्याची शक्यता आहे. दरम्यान, राज्य ऊस उत्पादक संघाने साखर आयुक्त शेखर गायकवाड यांची भेट घेत यंदाचा गळीत हंगाम 1 डिसेंबरला सुरू करण्याची मागणी केली आहे.