नवी दिल्ली : देशातील करोनाचा विळखा काही प्रमाणात सैल होताना पाहायला मिळत आहे. कारण देशात सलग दुसऱ्या दिवशी नव्या करोनाबाधितांच्या संख्येत घट झाल्याचे दिसून आले आहे. कालच्या तुलनेत आज करोनाच्या रुग्णांची संख्या कमी झाली आहे. गेल्या 24 तासांत देशात करोनाचे तीन लाख 33 हजार 533 नवीन रुग्ण आढळले असून 525 जणांचा मृत्यू झाला आहे.
देशातील दैनंदिन रुग्णवाढीचा दर 17.78 टक्के इतका झाला आहे. विशेष म्हणजे कालच्या तुलनेत देशात चार हजार 171 कमी रुग्ण आढळले आहेत. आदल्या दिवशी करोनाचे तीन लाख 37 हजार 704 रुग्ण आढळले होते.
केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने जारी केलेल्या आकडेवारीनुसार, सध्या देशातील सक्रिय करोनारुग्णांची संख्या 21 लाख 87 हजार 205 झाली आहे. त्याचबरोबर या साथीमुळे जीव गमावणाऱ्यांची संख्या चार लाख 89 हजार 409 झाली आहे. आकडेवारीनुसार, शनिवारी दिवसभरात दोन लाख 59 हजार 168 लोक बरे झाले, त्यानंतर आतापर्यंत तीन कोटी 65 लाख 60 हजार 650 लोक संसर्गमुक्त झाले आहेत.
देशव्यापी लसीकरण मोहिमेअंतर्गत आतापर्यंत 161 कोटींहून अधिक अँटी-करोनाव्हायरस लसींचे डोस देण्यात आले आहेत. काल 71 लाख 10 हजार 445 डोस देण्यात आले, त्यानंतर आतापर्यंत 161 कोटी 92 लाख 84 हजार 270 डोस लसीचे डोस देण्यात आले आहेत. वर्ल्डोमीटर या वेबसाईटनुसार, जगभरात तीन दिवसांत 10 दशलक्षाहून अधिक करोना रुग्ण नोंदवले गेले आहेत, तर दररोज सरासरी नऊ हजार लोक आपला जीव गमावत आहेत.