नवी दिल्ली – जगातील सर्वात मोठी लोकशाही असलेल्या भारताच्या राष्ट्रपतींच्या सुरक्षेसाठी 200 तगड्या जवानांचा समावेश असलेली घोडदळाची तुकडी तैनात असते. या तुकडीला खूप मोठा इतिहास आहे. ब्रिटीशांच्या काळात व्हॉईसरायच्या सुरक्षेसाठी ही घोडदळाची तुकडी कार्यरत होती. आता राष्ट्रीय समारंभाच्या दिवशी ही तुकडी राष्ट्रपतींच्या ताफ्यासोबत असते.
या तुकडीत निवड होणे हा प्रत्येक जवानासाठी मोठी सन्मानाची गोष्ट असते. डिसेंबर 2019 मध्ये या तुकडीतील रिक्त झालेल्या नऊ जागांसाठी 10,000 जवानांनी अर्ज केले होते. यावरून या तुकडीचे महत्त्व लक्षात येते. या तुकडीत निवड होण्यासाठी जवानाची उंची कमीत कमी सहा फूट असावी लागते. आकर्षक शरीरयष्टी आणि वागण्याबोलण्यातील उच्च समज यावरून या तुकडीत निवड केली जाते.
1973 पासून ही तुकडी कार्यरत आहे. देशाला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर फाळणी झाली तेव्हा व्हॉईसरॉय वापरत असलेली काळ्या रंगाची सोन्याच्या रंगाचा पत्रा लावलेल्या आकर्षक बग्गीवर आणि तिच्यासाठीच्या घोड्यांवर पाकिस्तानने हक्क सांगितला होता. मग हा प्रश्न नाणेफेक करून निकाली काढण्यात आला. नाणेफेक भारताच्या बाजूने झाली आणि बग्गी व घोडे भारताला मिळाले. आजही राष्ट्रपती प्रजासत्ताक दिनी या बग्गीतून येतात.
या घोडदळाच्या तुकडीला अडीचशे वर्षांच्या इतिहास आहे. त्यांना प्रेसिडेंट बॉडीगार्ड म्हणून ओळखले जाते. 1773 मध्ये जेव्हा वॉरेन हेस्टींग हे भारताचे व्हाईसरॉय जनरल म्हणून आले, तेव्हा त्यांनी स्वतःच्या सुरक्षेसाठी एक रेजिमेंट स्थापन केली. त्या रेजिमेंटमध्ये युद्ध कौशल्यात निपुण आणि उंचपुऱ्या 50 जवानांची नियुक्ती करण्यात आली होती. जेव्हा इंग्रजांच्या 200 वर्षांच्या गुलामीतून 1947 साली भारत स्वातंत्र्य झाला तेव्हापासून या रेजिमेंटकडे राष्ट्रपतींच्या सुरक्षेची जबाबदारी आली. राष्ट्रपतींच्या अंगरक्षकांसाठी पारंपारिक गणवेश असतो. या रेजिमेंटचा एक गौरवशाली इतिहास आहे. या रेजिमेंटसाठी वेगवेगळ्या तुकड्यांमधील जवानांची निवड केली जाते.
सध्या असणाऱ्या या रेजिमेंट मधील जवानांना विशेष प्रशिक्षण देण्यात आलेले आहे. त्यांना पॅराट्रूपर म्हणून तसेच घोडेस्वारीचे देखील प्रशिक्षण देण्यात आलेले असते. स्वाभाविकपणे त्यांचे घोड्यांशी एक वेगळे नाते तयार झालेले असते. हे उंचपुरे जवान घोड्यांची निगा राखण्यात तितकेच तरबेज असतात. त्यांच्याकडील घोड्यांच्या मानेवर लांब केस ठेवण्याची परवानगी असते. लष्करातील अन्य घोड्यांना अशी परवानगी नसते. राष्ट्रपतींचे अंगरक्षक स्वतःसाठी सर्वोत्कृष्ट घोड्यांची निवड उत्तर प्रदेशातील सहारनपुर आणि उत्तराखंड मधील हेमपूर येथे असलेल्या रिमोट ट्रेनिंग स्कूल मधून करतात. ह्या घोड्यांची निवड करताना अनेक निकष लावले जातात.
प्रजासत्ताक दिनाच्या संचलनात सहभागी होणाऱ्या घोड्यांची लांबी कमीत कमी 157.5 सेंटीमीटर असणे आवश्यक असते. त्यांचा रंग केवळ तपकिरी किंवा गडद तपकिरी असावा लागतो. घोडे हे स्वभावाने अतिशय संवेदनशील असतात. त्यामुळेच त्यांचे जवानांची एक नाते तयार झालेले असते आणि घोड्यांची आवड-निवड देखील जवानांना माहिती असते. राष्ट्रपतींच्या अंगरक्षकांच्या दलामध्ये सहभागी असणारे जवान उत्तम अश्वारोहण करणारे असतात त्याचबरोबर पॅराट्रूपर म्हणूनही त्यांच्याकडे कौशल्य असते. विशेष गोष्ट म्हणजे या दलामधील सामील असणाऱ्या काही जवानांची तर तिसरी पिढी अंगरक्षक म्हणून काम करत आहे. या दलाच्या निवासाची व्यवस्था राष्ट्रपती भवनाच्या आवारातच करण्यात आलेली असते.