मुंबई (प्रतिनिधी) – मालेगाव 2008च्या बॉम्बस्फोट प्रकरणातील संशयीत साध्वी प्रज्ञासिंह ठाकूर आणि सुधीर कुलकर्णी यांनी या खटल्यातून दोषमुक्त करण्यासाठी दाखल केलेल्या आणि प्रलंबित असलेल्या सर्व याचिकांवर 18 नोव्हेंबरपासून नियमित सुनावणी घेण्याचे निश्चित केले आहे.
या बॉम्बस्फोट खटल्यातील प्रमुख आरोपी ले. कर्नल प्रसाद पुरोहित, खासदार साध्वी प्रज्ञासिंग यांच्यासह आरोपी समीर कुलकर्णी यांनी उच्च न्यायालयात याचिका दाखल करून खटल्यातून दोष मुक्त करावे, अशी विनंती केली आहे. तसेच राष्ट्रीय तपास पथकाने लावलेल्या नवीन आरोपांना आरोपींनी विरोध केला आहे. तर खटल्यात दाखल केलेल्या साक्षीदारांच्या छायांकित जबाबाच्या प्रतीबाबतही आरोपींकडून आक्षेप घेणाऱ्या याचिका दाखल केल्या आहेत.
या याचिकांना विरोध करणारी हस्तक्षेप याचिका पिडीत पिता निसार बिलाल यांनी केली आहे. या याचिकांवर न्यायमूर्ती एस. एस. शिंदे आणि न्यायमूर्ती सूर्यवंशी यांच्या समोर सुनावणी झाली. यावेळी याचिकाकर्त्यांनी याचिकांवर सलग आणि सविस्तर सुनावणी घ्यावी, अशी विनंती न्यायालयाला केली.
तर न्यायालयाच्या निर्देशानुसार कनिष्ट न्यायालयात खटल्याची नियमित सुनावणी सुरू असल्याचे एनआयएच्या वतीने ऍड. संदेश पाटील यांनी सांगितले. याची दखल घेत न्यायालयाने याचिकांची सुनावणी 18 नोव्हेबरपासून नियमित घेण्याचे निश्चित केले.