घंटागाड्या वेळेवर येत नसल्याच्या तक्रारी
सातारा – करंजे गावठाणाचा सतत विस्तार होत असल्याने कचऱ्याची समस्या गंभीर बनत चालली आहे. कचरा टाकण्यासाठी पुरेशी जागा नाही, कचरा वेळेत उचलला जात नाही. त्यामुळे परिसरात कचऱ्याचे साम्राज्य पसरत असून आरोग्याच्या समस्या वाढला आहे. घंटागाड्या वेळेत येत नसल्याच्या नागरिकांच्या तक्रारी असून अतिक्रमणे झालेल्या जागेत कचराकोंडी होत आहे. भैरवनाथ कॉलनी, जय मल्हार उद्योग समूहाची पिछाडी, म्हसवे रोड या भागातील कचऱ्याची विल्हेवाट लावण्यासाठी ग्रामपंचायतीला नियोजन करावे लागणार आहे.
सातारा शहरात रोज किमान 40 मेट्रिक टन कचरा निर्माण होतो. त्यातील 90 टक्के कचरा उचलण्याची यंत्रणा पालिकेकडे आहे. सोनगाव येथील घनकचरा प्रक्रिया प्रकल्पाची क्षमता संपल्याने कचऱ्याची विल्हेवाट लावण्याचा प्रश्न पालिकेसमोर आहे तरीसुद्धा पदाधिकाऱ्यांनी बायोमायनिंगचा घाट घातला आहे. करंजे गावठाणात पुरेशी जागा नसल्याने कचरा वेळेवर उचलला जात नाही. कचऱ्याची वाहतूक करणारे अवघे तीन कंटेनर पालिकेकडे आहेत. त्यामुळे कचरा उचलण्यावर मर्यादा येतात. झेंडा चौक, आंदेकर चौक, कन्या शाळा परिसर, समाजमंदिर परिसर, टीसीपीसी भवनाच्या पिछाडीच्या भागातील कचरा कधी उचलला जाईल, याचा नेम नाही. उपनगरातील कचराकुंड्या ओसंडून वाहतात. अनेक ठिकाणी कचरा उचलला जात नसल्याने दुर्गंधीचे साम्राज्य पसरत आहे. टीसीपीसी भवनाच्या परिसरात भटक्या कुत्र्यांची दहशत निर्माण झाली आहे.
शहराशेजारील ग्रामपंचायतींच्या परिसरात कचऱ्याचा प्रश्न अधिक गंभीर बनला आहे. सातारा शहरात प्रवेश करताना वाटेत येणारे करंजे गावठाण महत्त्वाचे आहे. सातारा-पुणे जुन्या मार्गावर आयटीआयच्या पिछाडीला कचऱ्याचे ढीग साठत आहेत. त्यामुळे कचऱ्याची दुर्गंधी घेत किंवा नाकातोंडाला रुमाल लावतच लोकांना साताऱ्यात प्रवेश करावा लागतो. अशीच स्थिती सैदापूर रोड, झेंडा चौक कोपरा, भोसले मळा, बाबर कॉलनी येथे आहे. करंजे गावठाणात कचरा निर्मूलनासाठी स्वतंत्र जागा नाही आणि सोनगाव कचरा डेपोकडे घंटागाड्यांच्या फेऱ्या अनियमित असल्याची तक्रार आहे. करंजे परिसरात गायरान जागेत कचरा निर्मूलन प्रकल्प उभारण्याची मागणी आहे.
मात्र, कचऱ्याची वाहने त्या जागेपर्यंत पोहोचत नसल्याने पर्यायी जागेचा शोध घ्यावा लागत आहे. पर्यायी जागा पुरेशी नसल्याने कचरा उचलण्यास विलंब होत आहे. जागेच्या उपलब्धतेनुसार सोयीने कचरा उचलला जात आहे. बाबर कॉलनी ते झेंडा चौक या दरम्यान जास्त मोकळी जागा असल्याने सर्वाधिक कचरा तिथे टाकला जातो. त्याची विल्हेवाट लावण्यासाठी अद्ययावत प्रक्रिया केंद्राची गरज आहे. अनेकदा कचरा वेळेत उचलला जात नाही. त्यात दुर्गंधीचे साम्राज्य आहे. भारती विद्यापीठ संचलित शाळेच्या मागे ओढ्यात कचरा टाकला जातो. अनेकदा कचरा पेटवला जातो. धुराचे लोट उसळतात.