मुंबई : शासनाच्या विविध योजनांची सर्वसामान्य नागरिकांना माहिती देण्यासाठी मुख्यमंत्री योजनादूत उपक्रम सुरु करण्यात आला आहे. यासाठी राज्यातील तब्बल ५० हजार तरुणांची भरती करण्यात येणार आहे. या उपक्रमाअंतर्गत सरकारतर्फे प्रतिमहिना 10 हजार रुपये मानधन दिले जाणार आहे. महाराष्ट्र शासनाच्या माहिती व जनसंपर्क महासंचालनालयामार्फत मुख्यमंत्री योजनादूत उपक्रम राबविण्यात येत आहे.
प्रत्येक ग्रामपंचायत पातळीवर एक तर शहरी भागात प्रत्येक पाच हजार लोकसंख्येमागे एक अशा पद्धतीने राज्यात एकूण ५० हजार योजनादूतांची सहा महिन्यांसाठी निवड केली जाणार आहे. या योजनादूतांना दरमहा १० हजार रूपये मानधन दिले जाणार आहे. हे योजनादूत शासनाच्या लोककल्याणकारी योजनांबाबत नागरिकांना माहिती देतील.
समाजातील वेगवेगळ्या घटकांच्या उत्थानासाठी राज्य सरकारतर्फे वेगवेगळ्या योजना राबवल्या जातात. याच योजनांचा फायदा समाजातील प्रत्येक घटकाला मिळावा म्हणून सरकारतर्फे प्रयत्न केला जातो. म्हणजेच या योजनांची प्रभावी अंमलबजावणी करण्यासाठी प्रयत्न केले जातात. या योजनांची माहिती शेवटच्या व्यक्तीपर्यंत पोहोचावी यावर काम करणे गरजेचे आहे. याच कामाची जबाबदारी योजनादूंतावर सोपवली जाणार आहे. राज्यातील विविध योजनांची माहिती सामन्य जनतेला देणे, हे या योजनादूतांचे काम असणार आहे.
या योजनेत सहभागी होण्यासाठी इच्छुक उमेदवार १८ ते ३५ वयोगटातील असावा, उमेदवार कोणत्याही शाखेचा पदवीधर असणे आवश्यक आहे, उमेदवाराकडे महाराष्ट्राचे अधिवास प्रमाणपत्र असणे आवश्यक आहे. उमेदवारास संगणक ज्ञान असावे. त्याच्याकडे अद्ययावत मोबाईल (स्मार्ट फोन) आणि आधारसंलग्न बँक खाते असणे आवश्यक आहे.
कसा कराल अर्ज
मुख्यमंत्री योजनादूत उपक्रमासाठी केलेला ऑनलाईन अर्ज, आधार कार्ड, पदवी उत्तीर्ण असल्याबाबतची पुराव्यादाखल कागदपत्रे / प्रमाणपत्र इ., अधिवासाचा दाखला. (सक्षम यंत्रणेने दिलेला), उमेदवाराकडे आधार जोडणी असलेल्या बँक खात्याचा पुरावा, पासपोर्ट आकाराचा फोटो, हमीपत्र (ऑनलाईन अर्जासोबतच्या नमुन्यामधील) नियुक्तीवेळी सादर करणे आवश्यक आहे. १३ सप्टेंबर २०२४ पर्यंत इच्छुक उमेदवारांना www.mahayojanadoot.org या संकेतस्थळावर नोंदणी करता येईल.