प्रशांत जाधव
चिमुकल्यांना ट्रकचा आधार; तोड उसाची अन् हेळसांड होतेयं बालपणाची
सातारा – छत्रपती शिवाजी राजांच्या काळात पोटच्या गोळ्यासाठी गड चढून आलेली हिरकणी सर्वांना माहिती आहे. मात्र, पोटाची आग भागवण्यासाठी, संसाराचा गाडा हाकण्यासाठी पोटच्या पोरांना कधी ऊसाच्या फडातील पाचटीवर झोपवून तर कधी ट्रकच्या खालच्या बाजूला झोका बांधून “बागायदार, जरा लेकरावर लक्ष असू द्या,’ असे म्हणत सपासपा ऊसावर कोयता चालवणाऱ्या हिरकणींची कहाणी जगावेगळी आहे. अशीच एक हिरकणी कातरखटाव (ता. खटाव) येथील एका शेतात राबताना नजरेस पडली.
नाव सुनंदा. गाव बीड जिल्ह्यातील केज तालुक्यातील. वय वर्षे 27. एक लेकरू कडेला तर दुसरे पदराआड घेऊन ती विजेच्या वेगाने कातरखटावच्या निलेश इंगवले यांच्या शेताकडे नवऱ्यासोबत निघाली होती. काळोख्या अंधारातही ती काट्याकुट्यातून जाताना कडेवरच्या भुकेने व्याकूळ झालेल्या लेकरांना सांगत होती. “बाळा, बागायदाराच्या रानात गेल्यावर मी तुला खाऊ देते.’ अन् तिने खाऊ दिलाही. पण तो तुमच्या आमच्या पोरांना मिळतो तसा नव्हता. तर एका मळकट फडक्यात बांधलेली दिवसभराच्या उन्हाच्या तडाख्याने वाळलेली चपाती होती.
वय अवघे चार वर्षे असलेल्या थोरल्या पोरीला कदाचित आईबापाच्या परिस्थितीची जाणीव असावी, तिने कोणतीही तक्रार न करता दोन घास खाल्ले अन् ऊसाच्या पाचटीवरच ती झोपी गेली. तर अवघ्या सात महिन्यांच्या किशोरला तिने ज्या ट्रकमध्ये तोडलेला ऊस भरायचा होता त्याच ट्रकच्या पाठीमागच्या बाजूला झोका बांधून त्यात त्याला झोपवला. त्यानंतर तब्बल तीन तास ती तोडलेला ऊस ट्रकमध्ये भरत होती. त्यादरम्यानच्या काळात ना तिने लेकरांकडे पाहिले, ना लेकरांनी तिच्या कामात व्यत्यय आणला. गाडी भरून झाली, ट्रक कारखान्याच्या दिशेने निघणार इतक्यात तिने आपल्या पोटच्या गोळ्यांना बाजूला घेतले. अन् पुन्हा खोपटाकडे जाणारी पायवाट त्याच अंधारात तुडवण्यास सुरूवात केली.
ऊसतोडणी कामगारांचा दिवस पहाटे अडीचच्या दरम्यान सुरू होतो. पुरूष मंडळी पहाटे पाचच्या सुमारास तर महिला सकाळचा स्वयंपाक आवरून सात वाजण्याच्या दरम्यान खोपीवरून ऊसाच्या फडात जातात. हे सर्व कामगार दुपारी दोन ते चारच्या दरम्यान परत आले तर येतात. नाहीतर काम संपल्यावरच यांच्या घराकडे जाणारा मार्ग मोकळा होतो.
आज एकाच्या तर उद्या दुसऱ्याच्या रानात कामाला जायचे असल्याने यांचा ठिकाणा काही एका जागेवर नसतो. त्यामुळे हे कामगार पालक सुरक्षिततेच्या काळजीने आणि कामाला मदत म्हणून मुलांना आपल्या बरोबर फडात घेऊन जातात. तेथे ना पुरेसा आडोसा, ना पुरेशी आरामाची जागा. ही सगळी लहान मुले तेथेच ऊसाच्या पाचटावर बसून काम करत किंवा खेळत दिवस घालवतात आणि काही दरवर्षी अपघातांनाही बळीही पडतात.
पैदाच फडात झालायं
सुनंदा यांनी ऊस भरण्यास सुरूवात करण्यापूर्वी सात महिन्याचे वय असलेल्या किशोरला कडेवर घेतला होता. बाकीची मंडळी आली की, कामाला सुरूवात करायची असे नियोजन त्यांच्या डोक्यात सुरू होते. दरम्यान, त्याठिकाणी असलेल्या शेतकऱ्याने बाळाला कुठे ठेवणार, असा सवाल केला. त्याला उत्तर म्हणून सुनंदा म्हणाल्या, “टाकायचा पाचटावर त्याला काय होत नाय, पैदाच ऊसाच्या फडात झालायं,’ असे उद्विग्नपणे सांगून थेट ऊसाच्या मोळीला हात घातला.
जिथे तोड तिथेच आमचा गाव
कातरखटाव येथील शेतात ऊसतोडणी करणाऱ्या कामगारांना शेतकऱ्याने त्यांच्या गावाबद्दल विचारणा केली. तेव्हा त्यातील एका कामगाराने “आम्हाला कुठलं आलयं गाव, जिथे तोड तिथेच आमचा गाव,’ या दिलेल्या उत्तराने त्यांच्या व्यथांची जाणीव करून दिली.