वाई शहरासह ग्रामीण भागात वाढताहेत प्रकार, ठोस कारवाईची मागणी
धनंजय घोडके
वाई –सध्या राज्यात विभागवार सैन्य भरती प्रक्रिया सुरु असून ग्रामीण व शहरी भागातील सामान्य कुटुंबातील तरुण-तरुणी भरतीपूर्व तयारीसाठी मेहनत घेताना दिसत आहेत. अनेक तरुणांनी ऍकॅडमीमध्ये प्रवेश घेतला असून त्यांची कसून तयारी सुरु आहे. परंतु काही एजंट तरुणांना भरतीचे आमिष दाखवून लाखो रुपयांची मागणी करुन फसवणूक करत असल्याचे प्रकार वाई तालुक्यात वाढीस लागले आहेत. अशा प्रकारची फसवणूक करणारांची टोळीच तालुक्यात सक्रिय झाल्याचे बोलले जात असून पोलिसांनी त्यावर ठोस कारवाई करावी, अशी मागणी होऊ लागली आहे.
सध्याच्या परिस्थितीत उच्च शिक्षण घेऊनही नोकऱ्या मिळत नसल्याने अनेक तरुण बेरोजगार आहे. दिवसेंदिवस हे प्रमाण वाढत आहे. त्यामुळे ग्रामीण भागासह शहरातील तरुण वर्ग आता पोलीस आणि सैन्य भरतीकडे मोठ्या प्रमाणात वळल्याचे पहावयास मिळते. त्यासाठी अनेकजण पोलीस भरती ऍकॅडमीमध्ये प्रशिक्षणदेखील घेत आहेत. मात्र नोकरीसाठी धडपडणाऱ्या या तरुणांसह हतबल झालेल्या त्यांच्या कुटुंबियांचा काहीजण गैरफायदा घेऊ लागले आहेत. अगदी तीन लाखांपासून ते पुढे वाट्टेल तेवढे पैशाची मागणी करुन सैन्यात अथवा पोलीसमध्ये भरती करतो, अशाप्रकारचे अमित तरुणांता अथवा त्यांच्या कुटुंबियांना दाखविले जात आहे.
हतबल झालेले तरुण आणि त्यांच्या कुटुंबीय मागचापुढचा कोणताही विचार न करता कर्ज काढून पैसा गोळा करुन या एजंटांकडे देत आहेत. मात्र पैसे दिल्यानंतर वर्षानुवर्षे काम होत नसल्याने आपली फसवणूक झाल्याचे त्यांच्या लक्षात येत आहेत. मात्र पैसे दिलेल्या कोणताही पुरवा नसल्याने एजंटांविरुद्ध तक्रारीदेखील करता येत नसल्याने तोंड दाबून बुक्क्यांचा मार सहन करावा लागत आहेत. आणि याच परिस्थितीचा गैरफायदा घेऊन अशा एजटांची टोळी वाई तालुक्यात मोठ्या प्रमाणात सक्रिय झाली आहे. या संदर्भात माहिती देताना ऍकॅडमीचे संचालक राजेंद्र खरात म्हणाले, सैन्यदलात निवड प्रक्रिया जवळ आली आहे, त्या हेतूने दलालांमार्फत पालकांची व विद्यार्थ्यांची फसवणूक करण्याच्या उद्देशाने युवकांना गळ घालताना दिसत आहे.
आर्मी भरती जवळ आल्यामुळे उमेदवारांकडून अथवा पालकांकडून 3/4 लाख रुपये उकळण्याच्या उद्देशाने भरतीचे आमिष दाखविण्यात येत आहे. आमची खूप मोठी टीम आहे, आमचा वशिला खूप वरपर्यंत आहे, रत्नागिरी येथील भरतीत आमचा स्टाफ आला आहे, आमच्याच साहेबांनी पेपर काढला आहे. शंभर टक्के काम करून देतो. काम झाल्यावरच पैसे द्या. तोपर्यंत उमेदवाराचे फक्त 10 वीचे बोर्ड सर्टीफिकेट किंवा काही रक्कम आमच्या ताब्यात ठेवा. भरती नाही झाला तर तारण ठेवलेले कागदपत्रे व सर्व पैसे परत करतो, असे भासवून फसवणूक करणाऱ्यांची टोळी सातारा जिल्ह्यात सक्रिय झाली आहे. तरी पालकांनी अशा भामट्यांपासून दूर रहावे. भरती प्रक्रियेत जर भ्रष्टाचार होऊ लागला तर देशाची सुरक्षा धोक्यात येईल. चांगली सुदृढ व शारीरिक परीक्षेत उत्तीर्ण होणारी मुले हेरून त्यांच्यावर पाळत ठेऊन सापळा लावला जात आहे. काही ऍकॅडमीच्या चालकांना पन्नास टक्क्यांचे आमिष दाखविले जात आहे.