पिंपरी – येत्या काही दिवसांतच पावसाळा सुरू होत आहे. सध्या जगभरात “करोना’नावाच्या महामारीने थैमान घातले आहे. “करोना’चा मोठा ताण सध्या वैद्यकीय यंत्रणेवर जाणवत आहे. अशा परिस्थितीत वेगवेगळ्या आजारांपासून नागरिकांना सुरक्षित ठेवणे ही महापालिका प्रशासनाची प्राथमिकता असणे अपेक्षित आहे. परंतु शहराला ज्या ठिकाणाहून पिण्याच्या पाण्याचा पुरवठा होतो, त्याच रावेत बंधाऱ्यावर पाणी प्रदूषित केले जात आहे. याबाबत “इसीए’ने संताप व्यक्त केला.
“इसीए’ने याबाबत प्रसिद्ध केलेल्या पत्रकात म्हटले आहे की, गेल्या 18 वर्ष सातत्याने आम्ही शहरातील पिण्याच्या पाण्याच्या जलसाठ्याच्या सुरक्षितेच्या बाबतीत विचारणा करीत आहोत. पण महापालिकेने त्या जागी 2008 साली व 2020 साली एक लोखंडी पाटी लावण्यापलीकडे कोणतीही कायम स्वरूपी सुरक्षा उपाय केलेला नाही, त्यामुळे तेथे वावरणाऱ्या नागरिकांच्या जीवितास धोका आहेच. तसेच याच पाण्यात स्थानिक नागरिक कपडे धुतात, आंघोळ करतात आणि वाहने देखील धुतात. यामुळे 27 लाख पिंपरी-चिंचवडकरांच्या पिण्याच्या पाण्याच्या जलसाठ्याच्या प्रदूषणाचा विषय गंभीर बनत चालला आहे.
“इसीए’ कडून हा विषय राजकीय नेतृत्त्वाच्या कानावर टाकला आहे. महापौर यांच्या निदर्शनास विषय आणून दिला आहे. तरीपण हा विषय गांभीर्याने हाताळण्यास पुढाकार घेतला जावा ही गरज आहे. आता पावसाचे पाणी नदीपात्रात आल्याने रावेत बंधाऱ्यावरून पाणी वाहते आहे तरी पण तेथील नागरिक बंधाऱ्यावरील वावर व वाहनांची रहदारी थांबवित नाहीत. प्रशासनाने पुढाकार घेऊन संभाव्य धोके थांबविणे अपेक्षित आहेत. महापालिका फक्त मृतदेह शोधण्यात लाखो रुपये खर्च करीत असते. याबाबत तातडीने उपाययोजना राबवून पिण्याच्या पाण्याचे प्रदूषण थांबवावे आणि दरवर्षी दुर्घटनेमुळे होणारी मनुष्यहानी थांबवावी, असा “प्रवाह’ आहे.