नाशिक – कार-रिक्षा-स्कूटीच्या विचित्र अपघातात दोन जण ठार झाले आहेत. हा अपघात मुंबई-नाशिक महामार्गावर शहापूर जवळील कुमार गार्डनजवळ घडला. अश्विनी गोळे (रा. कवडास, शहापूर) आणि अन्य एका महिलेचा या अपघातात मृत्यू झाला आहे. अपघात एवढा भीषण होता की, स्कूटी आणि रिक्षाचा चक्काचूर झाला आहे. जखमींना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. सोमवारी सकाळी कुमार गार्डनजवळ ही भीषण घटना घडली. अपघाताची माहिती मिळताच पोलीसांनी घटनास्थळी धाव घेऊन पाहणी केली.
दरम्यान, गेल्या काही दिवसांपासून मुंबई-नाशिक महामार्गावर सातत्याने अपघातांची मालिका सुरुच आहे. काही दिवसांपूर्वी गंगा देवस्थान जवळील ब्रिजवर 3 गाड्यांचा विचित्र अपघात झाला होता. या थरारक अपघातात 2 जण जखमी झाले होते. आधी भरधाव कंटेनर पलटी झाला, त्याला मागून येणाऱ्या कंटेनरने धडक दिली आणि मग आयशर टेंपो येऊनही धडकला होता.