आळंदीव -शहर व परिसरात जीवनावश्यक वस्तू एक वेळेस कमी पडतील; परंतु अवैध दारूचा महापूर गेल्या चार महिन्यांपासून राजरोसपणे वाहत आहे. तर दिसत असूनही संबंधित खाते डोळे झाक करीत असल्याचा आरोप नागरिकांनी केला आहे.
आळंदी पोलीस ठाण्यापासून हाकेच्या अंतरावर तसेच चाकण चौकातील झोपडपट्टीमध्ये, भराव, मरकळ, वडगाव, केळगाव आदी रस्त्यांसह लक्ष्मी माता चौक ठिकाणी राजरोसपणे बिनधास्तपणे अवैध दारू व गांजाची विक्री होत आहे. तसेच मटका, जुगार ही खुलेआम खेळला जात आहे.
याठिकाणी पिंपरी-चिंचवड, निगडी, चिखली, मोशी, देहू रोड, दिघी, विश्रांतवाडी आदी परिसरातून ग्राहक पहाटे तीन वाजल्यापासूनच गर्दी करीत धिंगाणा घालतात. शहरात रस्त्यावर सकाळपासूनच मद्यपी पडलेले असल्याने ओंगळवाणे दर्शन नागरिकांना घडते.
तर याविषयी पोलिसांकडे काही सामाजिक कार्यकर्त्यांनी तक्रार केली असता ते ठिकाण आम्हाला तुम्ही दाखवा असे उत्तर पोलिसांकडून मिळत असल्याने कार्यकर्ते तक्रार करण्यास पुढे येत नाही. तरी पोलिसांनी अवैध दारू विक्रेत्यांवर कडक कारवाई करावी, अशी मागणी जोर धरीत आहेत.
राजकीय वरदहस्त?
आळंदीतील एका बड्या राजकीय पक्षाकडून दारू विक्रेत्यांना त्यांच्याकडूनही बळ दिले जात असल्याची चर्चा आळंदी शहरात आहे. आम्ही हप्ते देतो, त्यामुळेच तर आम्ही विक्री करू शकतो, असे काही दारूविक्रेत्यांचे म्हणणे आहे. जर दारू विक्रेतेच असे खुल्लेआम सांगत असतील तर ते राजकीय वरदहस्ताशिवाय शक्य नाही मात्र, खरे!
आळंदी शहरासह परिसरातील ज्या ठिकाणी अवैध दारूविक्रीसह अवैध धंदे ज्या ठिकाणी आढळून येतील त्यांच्यावर गुरुवार (दि. 5) पासून छापेमारी करून कडक कारवाई केली जाईल.
– रवींद्र चौधर, वरिष्ठ निरीक्षक, आळंदी पोलीस ठाणे