मुंबई – राज्यातील सर्वात महत्त्वाचं ठिकाण असलेल्या मंत्रालयात मागील काही वर्षांत आत्महत्या करण्याचे प्रयत्न वाढलेत. आधीच्या सरकारने याला कंटाळून मंत्रालयाच्या इमारतीत जाळी लावली होती. आता प्रवेशद्वारावरच एका शेतकऱ्याने विष प्राशान केलं. त्या शेतकऱ्याचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. सुभाष जाधव, असं, मृत शेतकऱ्याचं नाव आहे.
मयत सुभाष जाधव, हे पुणे जिल्ह्याच्या आंबेगाव तालुक्यातील जाधववाडी गावातील रहिवाशी आहेत. मागील सहा महिन्यांपासून जाधव यांचा गावातील शिंदे कुटुंबासोबत शेतजमिनीचा वाद सुरू होता. याच वादातून मंचर पोलिसांत शिंदे यांच्यावर तीन तर जाधव यांच्यावर दोन गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल आहेत.
दरम्यान आपल्यावर अन्याय होत असल्याचं भावनेतून सुभाष जाधव यांनी २० ऑगस्ट रोजी मंत्रालय गाठलं होतं. मात्र मंत्रालयात प्रवेश न दिल्याने त्यांनी प्रवेशद्वारावरच विष प्राशन केलं. त्यांना तातडीने जीटी रूग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. मात्र त्यांची मृत्यूशी झुंज अपयशी ठरली.
यावरून विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी ठाकरे सरकारवर टीका केली. शेतकऱ्यांच्या कोणत्याही प्रश्नाकडे राज्य सरकार लक्ष देत नाही. मंत्रालयात विष प्राशन केलेल्या शेतकऱ्याचा मृत्यू दुर्दैवी आहे. आता तरी शेतकऱ्याचा प्रश्न सोडविला पाहिजे, असं फडणवीस म्हणाले.