हिंगोली – जिल्ह्यातील कळमनुरी तालुक्यातील घोळवा शिवारात रविवारी (दि 28 ) रोजी दुपारी भर पावसात एका तरुण शेतकऱ्याने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. धोंडबा नारायण डुकरे (वय 45 रा. नरवाडी) असे मयत शेतकऱ्याचे नांव असल्याचे पोलिसांनी सांगितले. आत्महत्येचे कारण अद्याप स्पष्ट झाले नाही.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, कळमनुरी तालुक्यातील नरवाडी येथील शेतकरी धोंडबा डुकरे यांची घोळवा शिवारात सुमारे 5 एकर शेती आहे. सर्व शेती आईच्या नावे असून मागील काही वर्षापासून धोंडबा हेच शेती पाहतात. आज दुपारी ते शेतातकामासाठी गेले होते. त्यानंतर दुपारी पाऊस सुरु असतांनाच त्यांनी घोळवा शिवारात एका शेतात झाडाला दोरीने गळफास घेऊन आत्महत्या केली.
या प्रकाराची माहिती परिसरातील शेतकऱ्यांना कळाल्यानंतर त्यांनी तातडीने कळमनुरी पोलिसांना घटनेची माहिती दिली. पोलिस निरीक्षक वैजनाथ मुंडे, सहाय्यक पोलिस निरीक्षक रेखा शहारे यांच्या मार्गदर्शनाखाली जमादार देविदास सुर्यवंशी, पोले, शिवाजी इंगोले, गजानन होळकर, प्रशांत शिंदे यांच्या पथकाने घटनास्थळी धाव घेतली. पोलिसांनी या घटनेची माहिती नरवाडी येथे धोंडबा डुकरे यांच्याकुटुंबियांनाही दिली. मात्र त्यांची पत्नी बाहेरगावी गेल्यामुळे सायंकाळी उशीरापर्यंत त्या घटनास्थळी पोहोचल्या नव्हत्या..
मयत धोंडबा यांच्या पश्चात आई, पत्नी, चार मुली, एक मुलगा व भाऊ असा परिवार आहे. दरम्यान, मयत धोंडबा यांनी नेमके कोणत्या कारणामुळे आत्महत्या केली याचे कारण समजू शकले नाही. या प्रकरणी कळमनुरी पोलिस ठाण्यात सायंकाळी उशीरापर्यंत नोंद झाली नव्हती. या घटनेमुळे गावात हळहळ व्यक्त केली जात आहे.