सिडनी : भारताविरुद्धच्या उपांत्य लढतीत पावसामुळे स्पर्धेबाहेर गेलेल्या इंग्लंडची कर्णधार हेदर नाईटने निराशा व्यक्त केली. खेळायची संधी न देताच आम्ही स्पर्धेबाहेर कसे जाऊ शकतो, हा असा कसा नियम आहे, अशा शब्दांत नाईटने आपल्या भावना व्यक्त केल्या.
खरेतर अशाच अनाकलनीय नियमांचा फटका दक्षिण आफ्रिका संघाला 1992 च्या स्पर्धेत बसला होता व पावसाच्या व्यत्ययानंतर सामना सुरू झाला तेव्हा त्यांच्या समोर 1 चेंडूत 22 धावा करण्याचे आव्हान ठेवले गेले होते. हा क्षण जागतिक क्रिकेटची क्रूर चेष्टा ठरला होता.
जे त्यावेळी दक्षिण आफ्रिकेच्या संघाच्या वाट्याला आले तेच आता इंग्लंडसमोर आले. फक्त ती स्पर्धा पुरुष संघाची होती आणि ही स्पर्धा महिला संघाची आहे इतकाच फरक होता. त्यामुळे निसर्गानेच 1992 चा वचपा काढला असेही म्हणता येईल.