कोलंबो – करोनाबाधित कृणाल पंड्याच्या संपर्कात आल्यामुळे प्रमुख खेळाडूंना सहभागी होत न आल्यामुळे राखिव खेळाडूंना संधी देत बुधवारी श्रीलंकेविरुद्धचा दुसरा टी-20 सामना खेळताना भारताचा डाव केवळ 132 धावांवर रोखला गेला.
श्रीलंकेने नाणेफेक जिंकत भारताला प्रतम फलंदाजी दिली. मात्र, कर्णधार शिखऱ धवनचा अपवाद वगळता अन्य एकाही खेळाडूने चमक दाखवली नाही. या सामन्यात संधी मिळालेल्या महाराष्ट्राच्या ऋतूराज गायकवाड व देवदत्त पडीक्कल यांनी थोडीफार चमक दाखवली पण त्यांना मोठी खेळी करत संघाला आव्हानात्मक धावसंख्या उभारून देण्यात यश आले नाही.
धवन 40, पडीक्कल 29 व ऋतूराज 21 धावांवर बाद झाले. अकिला धनंजया व वनिंदू हसरंगा यांनी भारताच्या नवोदित फलंदाजांवर दडपण राखले. भारताचा डाव 20 षटकांत 5 बाद 132 धावांवर रोखला गेला.
मंगळवारी भारतीय संघाचा कृणाल पंड्या करोनाबाधित असल्याचे जाहीर झालवर त्याच्या संपर्कात आलेल्या तब्बल आठ खेळाडूंना या मालिकेतून अंग काढून घ्यावे लागले. कृणालच्या संपर्कात आलेल्या या आठ खेळाडूंमध्ये हार्दिक पंड्या, इशान किशन, मनीष पांडे, युजवेंद्र चहल, कृष्णप्पा गौतम, सूर्यकुमार यादव आणि पृथ्वी शॉ यांचा समावेश आहे. या सर्व खेळाडूंना विलगीकरणात पाठवले गेले आहे.
या सामन्यासाठी भारतीय संघात पडीक्कलसह ऋतुराज, चतन साकरिया आणि नितीष राणा यांना पदार्पणाची संधी देण्यात आली. त्याचबरोबर मोठा निर्णय घेत बीसीसीआयने इशान पोरेल, संदीप वॉरियर, अर्शदीप सिंग, आर. साई किशोर आणि सिमरनजित सिंग या नेट बॉलर म्हणून असलेल्या खेळाडूंना संघात स्थान दिले. त्यामुळे हे सर्व नेट बॉलर आता भारतीय संघाकडून तिसऱ्या सामन्यात खेळू शकतात.
संक्षिप्त धावफलक – भारत – 20 षटकांत 5 बाद 132 धावा. (शिखऱ धवन 40, देवदत्त पडीक्कल 29, ऋतूराज गायकवाड 21, अकिला धनंजया 2-29).