मुंबई : केंद्रीय निवडणूक आयोगाने शिवसेना नाव आणि पक्षाचे चिन्ह शिंदे गटाला दिल्यानंतर राज्यातील राजकीय वातावरण चांगलेच ढवळून निघाले आहे. राजकीय वर्तुळातून संमिश्र प्रतिक्रिया येत आहेत. त्यातच शिवसेना खासदार प्रतापराव जाधव यांनी देखील आपली प्रतिक्रिया दिली आहे. तसेच त्यांनी यावेळी आयोगाच्या निर्णयाला योग्य असल्याचे म्हटले.
आयोगाच्या निर्णयाविषयी बोलताना जाधव यांनी, आयोगाने दिलेला निकाल अभ्यासपूर्ण असल्याचा दावा केला आहे. एवढेच नाही तर मुळात ठाकरेंनी एकनाथ शिंदे यांना हलक्यात घेतले, त्यांचे महत्व व ताकद ओळखण्यात घोडचूक केली. यामुळे आज त्यांच्यावर हे लाचारीचे दिवस आल्याची खरपूस टीका सेना नेते तथा खासदार प्रतापराव जाधव यांनी केली. यावरी जाधव यांनी संजय राऊत यांचादेखील समाचार घेतला.
शिवशजयंती निमित्त आयोजित कार्यक्रमानंतर माध्यमांशी बोलताना जाधव यांनी विरोधकांवर सडकून टीका केली. यावेळी बोलताना,’ मुळात ठाकरेंना एकनाथ शिंदे यांची ताकद समजली नाही. त्यांना वाटले की फार झाले तर दहा बारा आमदार त्यांच्या समवेत जातील, तसे झाले तर त्यांना अपात्र ठरवून टाकू, अशा गैरसमजामध्ये ते राहिले. त्यामुळे त्यांच्यावर आजचे वाईट दिवस आले. शिंदे हे मुख्यमंत्री पदी असणे, त्यांचे कर्तृत्व आणि त्यांनी सहाच महिन्यात घेतलेले धडाकेबाज निर्णय, हे ठाकरे कंपूला सहन होत नसल्याने त्यांनी त्यांच्यावर गलिच्छ टीका करणे सुरू केले आहे. या वात्रटपणामुळेच आज ते खाली आले असल्याचे खासदार यावेळी म्हणाले.
निवडणूक आयोगाच्या निर्णयावर विचारले असता, त्यांनी हा निर्णय अभ्यासपूर्वक देण्यात आल्याचे ठामपणे सांगितले. या निकालाचे सविस्तर वाचन केले तर हे स्पष्ट होते. या निकालावर संजय राऊत यांचे भाष्य हास्यास्पद असल्याचे खासदार जाधव म्हणाले. निकालाच्या दिवशी दुपारपर्यंत आमचा न्यायव्यवस्था वर विश्वास असल्याचे सांगणाऱ्या राऊत यांनी निकाल आल्यावर वेगळीच भाषा वापरली. त्यामुळे राऊत यांनी स्वतः स्पष्ट करावं की, ते सकाळी खरं बोलत होते की, संध्याकाळी खोटे बोलत होते? राऊत यांना उद्धव ठाकरेंनी पैसे देऊन चाटूगिरी करण्याकरता ठेवले आहे.
तसेच राऊत सातत्याने एकनाथ शिंदे आणि शिवसेनेवर टीका करत आहेत. आता त्यांनी खासदारांना १०० कोटी दिल्याचा आरोप केला आहे. मात्र, राऊत यांचे गणित कच्चे आहे असे सांगून, एक खासदार हा सहा आमदारांचे प्रतिनिधित्व करत असतो. त्यामुळे राऊत यांनी आमच्यावर ३०० खोक्यांचा आरोप केला पाहिजे, अशी खिल्ली त्यांनी उडविली. ‘शिवसेना भवन व शाखा खाजगी मालमत्ता नाही’ अन्य प्रश्नाच्या उत्तरात खासदार म्हणाले की, शिवसेना भवन व शाखा कुुणाची खासगी मालमत्ता नाही, ती शिवसेनेचीच असल्याचा दावा जाधव यांनी केला.