वाहनधारक, नगरपालिका व वाहतूक शाखेचे पोलीसही गोंधळात
कराड – येथील प्रीतिसंगमावर होणारी वाहतूक कोंडी टाळण्यासाठी कराड नगरपालिकेने येथील पार्किंगला मनाई केली आहे. मुख्याधिकारी यशवंत डांगे यांनी हा निर्णय घेतला असून यामुळे स्वच्छ कराडसमोर पार्किंगचा नवा प्रश्न निर्माण झाला आहे. वाहनधारक, पालिका कर्मचारी व वाहतूक शाखेचे पोलीसही या नव्या वादाने गोंधळात पडले आहेत. दरम्यान वाहतुकीला शिस्त लावण्यासाठी गुरूवारी दोन वाहतूक पोलिसांची नियुक्ती करण्यात आली होती.
कराड नगरपालिकेने स्वच्छ क्रांतीचे पाऊल उचलत कचऱ्यातून शहरवासियांची सुटका केली. शहरात कोठेही दूरवर कचरा दिसत नाही. पालिका अधिकारी, पदाधिकारी व कर्मचारी यांचे प्रयत्न कौतुकास्पदच आहेत. हे करत असतानाच अस्ताव्यस्त पार्किंगमुळे शहराचे बिघडणारे सौंदर्य व होणारी अडचण दूर करण्यासाठी मुख्याधिकारी यशवंत डांगे यांनी महत्त्वाचे पाऊल उचलले. त्यांनी पहिला निशाणा दररोज सकाळी व सायंकाळच्या वेळेत सर्वात जास्त गर्दी असणाऱ्या प्रीतिसंगमावरील पार्किंग व्यवस्थेत बदल केला.
या परिसराला मोकळा श्वास घेता यावा यासाठी वाहनांना प्रीतिसंगम परिसरात येण्यास मनाई केली. काही नागरिकांनी या निर्णयाचे स्वागत केले असले तरी वाहनधारक मात्र या निर्णयाने अडचणीत आले आहेत. सध्या भगवा चौकापासून खाली बागेकडे कोणतेही वाहन सोडले जात नाही. तसेच भगवा चौक ते श्रीधर मुद्रणालय हा रस्ता वाहनांना घाटावरून बाहेर पडण्यासाठी एकेरी केला आहे. तर सोमवार पेठेतून हाटकेश्वर मंदिरमार्गे रॉयल पॅलेसमार्गे घाटावर येण्यासाठी एकेरी करण्यात आला आहे.
पालिकेच्या या निर्णयाबाबत वाहनधारक व वाहतूक शाखेचे कर्मचारी यांना काहीच माहित नसल्याने गेले दोन दिवस प्रीतिसंगमावर पालिका कर्मचारी, वाहनधारक व वाहतूक शाखेचे कर्मचारी यांच्यात वादावादीचे प्रकार सुरू झाले आहेत. पालिका अधिकारी व पदाधिकारी सामंजस्याने हा प्रश्न सोडविण्यासाठी प्रयत्न करत आहेत. मात्र हा निर्णय घेताना वाहतूक शाखेला विश्वासात न घेतल्याने त्यांच्यातूनही नाराजीचा सूर उमटत आहे.
दरम्यान नियोजन सभापती विजय वाटेगावकर, जयंत बेडेकर यांनी वाहतुकीला शिस्त लागावी व पार्किंगचा प्रश्न मिटावा यासाठी पुढाकार घेतला होता. गुरूवारी वाहतूक शाखेनेही आपली जबाबदारी ओळखत दोन ट्रॅफीक पोलिसांची प्रीतिसंगमावर नियुक्ती केली होती. मात्र नव्याने येणाऱ्या वाहनधारकांना या बदलाबाबत माहिती नसल्याने रात्री उशिरापर्यंत वादावादीचे प्रकार सुरू होते. सध्या वळविण्यात आलेल्या पार्किंगच्या ठिकाणी मात्र मोठ्या प्रमाणात वाहनांची गर्दी झाल्याचे दिसत आहे.