देवेंद्र फडणवीस यांची जयंत पाटील यांच्यावर टीका
मुंबई : विदर्भापासून भाजपच्या पराभवाची सुरुवात झाली आहे, अशी टीका करणारे राष्ट्रवादी कॉंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांना शेजाऱ्याच्या घरी मुलगा झाला, म्हणून पेढे वाटू नये, असा टोला विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी लगावला.
जिल्हा परिषद निवडणुकांमध्ये भाजप हा पहिल्या क्रमांकाचा पक्ष ठरला असून कॉंग्रेस, राष्ट्रवादी कॉंग्रेस व शिवसेनेपेक्षा आमची कामगिरी सरस आहे, असे फडणवीस यांनी स्पष्ट केले. दरम्यान, निकालानंतर प्रदेश भाजप कार्यालयात दिवसभर विविध विषयांवर चिंतन बैठकांचे सत्र सुरू होते. मात्र निकालांचा या बैठकांशी संबंध नसून संघटनात्मक तयारी व पक्षांतर्गत निवडणुकांसाठी या बैठका होत्या, असे फडणवीस यांनी सांगितले.
फडणवीस यांच्या नागपूरमध्ये भाजपला धक्का बसला. त्यावरून विरोधकांनी भाजपवर टीकास्त्र सोडले होते. त्याला प्रत्युत्तर देताना फडणवीस यांनी भाजपची कामगिरी चांगली असल्याचा दावा केला; पण निकालानंतर गुरुवारी प्रदेश कार्यालयात वरिष्ठ नेत्यांमध्ये बैठकांचे सत्र सुरू होते.