कानपूर – यष्टीरक्षकाच्या नियमात आयसीसीने केलेला एक बदल भारतीय संघासाठी लाभदायक ठरला. म्हणूनच जायबंदी झालेल्या वृद्धिमान साहाच्या जागी राखीव यष्टीरक्षक केएस भरत याला यष्टीरक्षण करता आले.
न्यूझीलंडविरुद्धच्या पहिल्या कसोटी सामन्यात साहा याच्या मानेला दुखापत झाली व त्याला मैदान सोडावे लागले. या कसोटीच्या तिसऱ्या दिवशी भारतीय संघाकडून भरत यष्टीरक्षण करण्यासाठी मैदानात उतरला तेव्हा अनेकांना आश्चर्याचा धक्का बसला. या कसोटीच्या अंतिम 11 खेळाडूंमध्ये त्याचे नावही नसताना तो यष्टीरक्षण कसे करू शकतो, असा सवालही उपस्थित केला गेला.
मात्र, मुख्य यष्टिरक्षक दुखापतीने जायबंदी झाला असेल तर त्याच्या जागी संघातील राखीव यष्टीरक्षक यष्टीरक्षण करू शकतो, असा आयसीसीच्या नवा नियम सांगतो. सामन्याच्या दुसऱ्या दिवशी नियमित यष्टीरक्षक वृद्धिमान साहाने 55 षटके यष्टीरक्षण केले. मात्र, त्याच्या मानेला दुखापत झाल्यानंतर नियमाचा आधार घेत मैदानात उतरलेल्या भरतने तिसऱ्या दिवसापासून यष्टीरक्षण केले.
नियम काय सांगतो….
आयसीसीच्या पूर्वीच्या नियमानुसार संघातील राखीव खेळाडू हा केवळ क्षेत्ररक्षण करण्यासाठीच मैदानात उतरू शकतो. तो फलंदाजी तसेच गोलंदाजी करू शकत नाही. या जुन्या नियमानुसार सामन्यादरम्यान जर यष्टीरक्षकाला दुखापत झाली तर उर्वरित खेळाडूंपैकीच एखाद्याला यष्टीरक्षण करावे लागत होते. मात्र नव्या नियमानुसार यष्टीरक्षकाला दुखापत झाल्यास त्याच्या जागी राखीव यष्टीरक्षक किंवा यष्टीरक्षणाची क्षमता असलेला कोणीही खेळाडू यष्टीरक्षण करू शकतो.