संगमनेर – निळवंडे धरण कोणी पूर्ण केले हे सर्व जनतेला माहीत आहे. निळवंडे आम्ही पूर्ण केले, आता नशिबाने कालव्यांतून पाणी सोडण्याची संधी तुम्हाला मिळाली आहे तर त्या संधीचा फायदा घेत लाभक्षेत्रातील शेतकऱ्यांना दुष्काळग्रस्तांना पाणी वाया जाण्याच्या आत पाणी सोडा, असा टोला आमदार बाळासाहेब थोरातांनी महसूलमंत्री राधाकृष्ण विखे यांना लगावला.
संगमनेरातील एका कार्यक्रमानंतर ते पत्रकारांशी संवाद साधताना बोलत होते. आ. थोरात म्हणाले, गेले चार महिने निळवंडे कालव्याचे उद्घाटन पंतप्रधानांच्या हस्ते करण्याचा घोळ सुरू आहे. त्याबाबत आम्ही एक शब्दही बोललेलो नाही. मात्र, आत्ता पाणी सोडले नाही तर ते वाया जाण्याची भीती आहे. त्यामुळे आता विनाकारण वेळ वाया घालवण्याऐवजी लवकरात लवकर लाभक्षेत्राला पाणी सोडले पाहिजे, एवढीच आमची मागणी आहे.
धरणातील शिल्लक पाणी पाहता कालव्याने कदाचित दोन आवर्तने देणेही शक्य आहे. या पाण्यामुळे पुढच्या वर्षात लाभक्षेत्राचे रुपडे बदलून जाणार आहे. धरणातील शिल्लक पाणी आवर्तनाच्या रूपाने द्यावे, असे पत्र आम्हाला राज्य शासनाला द्यावे लागले, हीच मोठी शोकांतिका आहे. आम्ही तसेच दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांनी आग्रह धरल्यानंतर याबाबत विचार व्हावा, यापेक्षा शासनाचे अपयश ते काय असा सवाल त्यांनी केला.
नवीन संसदीय इमारतीच्या उद्घाटनाबाबत बोलताना थोरात म्हणाले, राष्ट्रपती हे देशातील सर्वोच्च पद आपला मानबिंदू असून त्यांचा सन्मान वेगळा आहे. या सर्वोच्च पदावर सध्या आदिवासी महिला भगिनी विराजमान आहेत. त्यांच्या हस्ते उद्घाटन झाले असते तर अधिक चांगले झाले असते. मात्र, प्रत्येक ठिकाणी मी आणि माझीच पाटी लागली पाहिजे या वृत्तीमुळे त्यांना डावलले जात आहे.
सत्ताधाऱ्यांनी सर्वांना बरोबर घेऊन आनंदाने हा प्रसंग साजरा करायला हवा होता. राष्ट्रपतीच्या हस्ते होणारे उद्घाटन आणि त्यांच्यासमवेत सत्ताधारी आणि विरोधक असे दृश्य देशाला जास्त भावले असते. निळवंडे धरणाच्या पाण्यावरून महसूलमंत्री विखे व आमदार थोरात यांच्यात शाब्दिक युद्ध सुरू झाले आहेत. त्यात 31 तारखेला उपमुख्यमंत्री फडणवीस यांच्याकडून निळवंडे कालव्यातून पाणी सोडण्याची चाचणी घेण्यात येणार आहे. त्याअगोदर टीका टिपण्णीने वातावरण तापले आहे.
यावर्षी इतिहासात कधी नव्हे ते मे महिन्यात भंडारदरा व निळवंडे धरणात उपलब्ध असलेले सुमारे 10 टीएमसी पाणी लाभक्षेत्रातील दुष्काळी भागाला दिल्यास त्यांचे पुढचे वर्ष चांगले जाईल. उन्हाचा कडाका वाढल्याने पिके वाचतील, अन्यथा त्यांचे फार मोठे नुकसान होणार आहे, असे आमदार बाळासाहेब थोरात म्हणाले.