पुणे – केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्याविरोधात अवमानकारक वक्तव्य करणे ठाकरे गटाचे आमदार भास्कर जाधव यांना अडचणीत आणणारे ठरत आहे. राणेंविरूद्ध अवमानकारक भाषा वापरल्याबद्दल भास्कर जाधव यांच्यावर पुण्यामध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुणे शहरातील डेक्कन पोलीस ठाण्यात योगेश शिंदे यांच्या तक्रारीवरून जाधव यांच्यावर कलम 500,501 आणि 502 कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
काय म्हणाले होते भास्कर जाधव ?
सिंधुदूर्ग जिल्ह्यातील एका कार्यक्रमादरम्यान जाधव म्हणाले होते की, नारायण राणे हे देशाचे नेते असल्याचे सांगतात पण त्यांना गल्लीत कुत्रदेखील विचारत नाही. तसेच जाधव यांनी मध्यम, लघु, सुक्ष्म खाते म्हणत नारायण राणे, नितेश राणे, निलेश राणे या तिघांवर टीका केली होती. शिवसेनेने काही केले नाही, असे राणे म्हणतात मग तू काय म्हशी भादरत होता का ? अशा शब्दातही जाधव यांनी राणेंवर टीका केली होती. तसेच नारायण राणे केंद्रात मंत्री आहेत मात्र त्यांच्यामुळे देशात कोकणाची लाच जात आहे. राणेंना तामिळनाडूचा प्रश्न विचारल्यावर ते केरळचे उत्तर देतात. कोकण भागातून देशाला विद्वान, विचारवंत नेते मिळाले मात्र राणेंनी देशात कोकणाची लाज काढली, अशा शब्दात भास्कर जाधव यांनी टीका केली.
महाराष्ट्रात ओला दुष्काळ जाहीर होणार का? कृषीमंत्र्यांनी केलं स्पष्ट https://t.co/DTBVjkfnlf
— Digital Prabhat (@Dainik_Prabhat) October 20, 2022
दरम्यान, राणेंविरूद्ध केलेल्या या वादग्रस्त वक्तव्यामुळे आमदार भास्कर जाधव यांच्याविरोधात कुडाळ पोलिस ठाण्यातही गुन्हा दाखल करण्यात आला आहे.