मुजफ्फरपूर, – येथील चाकी सोहगपूर येथील मतदारयादीत बाहेरच्या लोकांची नावे समाविष्ट करण्यात आल्याबद्दल बिहारचे मुख्यमंत्री नीतीश कुमार आणि जिल्हाधिकारी यांच्यासह 14 जणांच्या विरोधात खटला दाखल करण्यात आला आहे. आगामी पंचायत निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर मतदार यादीत ही गडबड करण्यात आल्याचा आरोप वकील असणाऱ्या जयचंद्र प्रसाद साहनी यांनी केला आहे.
बिहारमध्ये पंचायत निवडणुकीसाठी जी मतदार यादी तयार करण्यात आली आहे, त्यात मोठी गडबड करण्यात आली असल्याच्या तक्रारी निवडणूक आयोगाकडे करण्यात आल्या आहेत. त्याची आयोगाने दखल घेतली असून अंतिम यादी तयार करण्यापूर्वी संबंधित अधिकाऱ्याकडून यादी बिनचूक असल्याची लेखी हमी घेतली जावी असे निर्देश त्यामुळे आयोगाने जारी केले आहेत. आता याच प्रकारच्या तक्रारवरून नीतीश आणि अन्य जणांच्या विरोधात तक्रार दाखल करण्यात आली आहे व खटलाही भरण्यात आला आहे.