वाघोली (प्रतिनिधी) : तुळापुर व फुलगाव परिसरामध्ये अनेक दिवसांपासून बिबट्याचा वावर असल्यामुळे लोकप्रतिनिधी व नागरिकांच्या मागणीनुसार तुळापुर येथील मरकळ रोडच्या पाटीलवस्ती परिसरामध्ये वनविभागाच्या वतीने शनिवारी (दि.२०) पिंजरा लावण्यात आला आहे. पिंजऱ्यामध्ये वरिष्ठांच्या मार्गदर्शनानुसार सावज ठेवण्यात आले असल्याची माहिती वनविभागाने दिली.
तुळापुर व परिसरामध्ये अनेक दिवसांपासून बिबट्याचा वावर आहे. बिबट्याने जनावरांचे देखील नुकसान केले असल्याने ग्रामस्थांमध्ये भीतीचे वातावरण आहे. लोकप्रतिनिधी व नागरिकांनी याठिकाणी पिंजरा बसविण्याची मागणी वनविभागाकडे केली होती.
हवेलीचे वनपरिक्षेत्र अधिकारी मुकेश सणस, वनपाल वाय. यु. जाधव, वनसंरक्षक बी. एस. वायकर यांच्या सहकार्याने तुळापुर येथे पिंजरा बसविण्यात आला आहे. यावेळी स्थानिक लोकप्रतिनिधी व ग्रामस्थांनी वनविभागाला सहकार्य केले.