मध्यप्रदेशचे मुख्यमंत्री कमलनाथ यांचा आरोप
नवी दिल्ली : देशाची आर्थिक स्थिती अत्यंत गंभीर बनली असून या विषयावरून लोकांचे लक्ष अन्यत्र विचलीत करण्यासाठीच मोदी सरकारने कॅब म्हणजेच नागरीकत्व दुरूस्ती विधेयकाचा घाट घातला असा आरोप ज्येष्ठ कॉंग्रेस नेते व मध्यप्रदेशचे मुख्यमंत्री कलमनाथ यांनी केला आहे.
आज वुमेन्स प्रेस क्लब मध्ये ते पत्रकारांशी बोलत होते. ते म्हणाले की देशात जेव्हा जेव्हा मंदीची स्थिती निर्माण झाली त्या प्रत्येकवेळ संदर्भ नसलेली विधेयके सादर करून मोदी सरकारने लोकांचे लक्ष अन्यत्र विचलीत करण्याचा प्रयत्न केला आहे. कॅब विधेयक आणण्यामागेही सरकारचा हाच हेतू होता असे ते म्हणाले.
देशातील तीन राज्यांनी कॅब विधेयक आपल्या राज्यात लागू न करण्याचा निर्णय घेतला आहे तसाच निर्णय आपण घेणार आहात काय असे विचारता ते म्हणाले की देशाचे विभाजन करणाऱ्या कोणत्याही कायद्याविषयी कॉंग्रेस पक्षाची राष्ट्रीय पातळीवर जी भूमिका असेल तीच आमची मध्यप्रदेश सरकारची भूमिका आहे असे ते म्हणाले.