सिम्बायोसिसतर्फे आंतरराष्ट्रीय परिषद
पुणे – आत्मनिर्भर भारतासाठी आपल्या देशातील तरुणाची भूमिका अत्यंत महत्त्वपूर्ण आहे. तरुणपिढीचा योग्य उपयोग करून घेतल्यास एक उज्वल राष्ट्र घडवण्यास नक्कीच मदत होईल, असा विश्वास केंद्रीय क्रीडा राज्यमंत्री किरेन रिजिजू यांनी व्यक्त केला.
सिम्बायोसिस विद्यापीठातर्फे आयोजित आंतरराष्ट्रीय परिषदेत प्रमुख पाहुणे म्हणून ते बोलत होते. यावेळी विद्यापीठाचे कुलपती डॉ. शां.ब. मुजुमदार, प्र-कुलपती डॉ. विद्या येरवडेकर, कुलगुरू डॉ. रजनी गुप्ते, आरोग्य विज्ञान विद्याशाखेचे अधिष्ठाता डॉ. राजीव येरावडेकरसह आदी उपस्थित होते.
रिजीजू म्हणाले, मानसिक आरोग्य हा एक अत्यंत महत्त्वाचा असा जागतिक विषय बनला आहे. जेव्हा एखादा देश विकासाच्या दिशेने वाटचाल करतो, प्रगती करतो तेव्हा देशातील लोकांचे मानसिक प्रश्न अधिक बळकट होत जातात. जेव्हा आपण उच्च शिक्षण घेतो, जेव्हा आपले जीवन हे उच्च तंत्रज्ञ होते तेव्हा अशा प्रकारच्या समस्या उद्भवू लागतात. जपानसारखे देश किंवा पाश्चिमात्य देशांमध्ये मानसिक आरोग्याचा प्रश्न हा मोठ्याप्रमाणावर आढळतो. त्यातुलनेत आफ्रिकन देश किंवा इतर अविकसित देशांमध्ये अशा प्रकारे लोकांचे मानसिक आरोग्य बिघडल्याचे प्रमाण खूपच नगण्य असल्याचे दिसून येते.
आपल्या देशात साक्षरतेचे प्रमाण जास्त असले तरीही आपण विकसित राष्ट्र होऊ शकत नाही. कारण आपण किती हुशार आहोत किंवा एखादा विषय आपल्याला किती चांगल्या प्रकार माहिती आहे हे पुरेसे नसून आपली उत्पादकता व आउटपुट देण्याची क्षमता किती आहे यावर आपल्या देशाच्या विकासाची व्याख्या ठरते. विद्यार्थ्यांना भावी आयुष्यात यशासाठी शैक्षणिक उत्कृष्टता आवश्यक ठरते आणि विद्यार्थ्यांना वास्तविक जीवनाचे ज्ञान देण्याची गरज असल्याचे ते म्हणाले.