मुंबई : महाराष्ट्रात करोना रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत आहे. अनेक जिल्ह्यात लॉकडाऊन करण्यात आलं आहे. तर काही ठिकाणी जमावबंदी लागू करण्यात आली आहे. या पार्श्वभूमीवर राज्यातील बुहुतांशी शाळा बंद करण्यात आल्या आहेत. पहिली ते आठवी पर्यंतच्या विद्यार्थ्यांना परीक्षेविना पुढच्या वर्गात प्रवेश देण्याचा निर्णय आधीच घेण्यात आला आहे. आता नववी आणि अकरावीसंदर्भात निर्णय घेण्यात आला आहे.
करोनाच्या वाढत्या प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर नववी आणि अकरावीच्या विद्यार्थ्यांची परीक्षा होणार नाही. करोनाचे रुग्ण वाढत असल्याने शिक्षण विभागाने हा निर्णय घेतला आहे. यापूर्वी पहिली ते आठवीच्या विद्यार्थ्यांना सरसकट उत्तीर्ण करण्याचा निर्णय शिक्षण विभागाने घेतला होता तर. दहावी आणि बारावीच्या परीक्षा ऑफलाईनच होणार आहे. या परीक्षांच्या वेळापत्रकात बदल करायचा की नाही, याबाबतचा निर्णय पुढील दोन दिवसांत मुख्यमंत्र्यांशी चर्चा करून घेतला जाणार असल्याचंही शिक्षण विभागानं सांगितलं आहे.