जम्मू – दोन महिन्यांपूर्वीच सुट्टीसाठी गावी आलेल्या जवानाचं घरच्यांनी लग्न ठरवलं होतं. मुहूर्तही ठरला आणि लग्नाची तयारी सुरू झाली होती. त्यामुळे सर्वजण आनंदात होते. मात्र अचानक आनंदाची जागा शोकाकूल वातावरणानं घेतली. जम्मू काश्मीरच्या पुंछ जिल्ह्यातील मनकोट सेक्टर येथील नियंत्रण रेषेच्या जवळ दारुगोळ्याचा ब्लास्ट झाल्याने २७ वर्षीय जवानाला वीरमरण आले.
भारतीय सैन्य दलाने याबाबत माहिती दिली आहे. शहीद जवानाचे नाव कमलदेव वैद्य आहे. सहा वर्षांपूर्वी कमल भारतीय सैन्यात भरती झाले होते. ते भारतीय सैन्याच्या १५ डोगरा रेजिमेंटमध्ये होते. एप्रिल महिन्यात जवान कमल सुट्टीत आपल्या गावी हमीरपूर येथील घुमारवीला आले होते. त्यावेळी त्यांचं लग्न निश्चित कऱण्यात आलं होतं. येत्या ऑक्टोबरमध्ये त्यांच्या लग्नाची तारीख काढण्यात आली होती.
एप्रिल महिन्यात आपल्या सुट्ट्या संपल्यानंतर कमल वैद्य पुन्हा आपल्या बटालियनमध्ये परतले होते. दुसरीकडे घरी कमलदेव यांच्या लग्नाची तयारी सुरू करण्यात आली होती. मात्र मुलगा शहीद झाल्याचे वृत्त कळताच कुटुंबावर दु:खाचा डोंगर कोसळला. संपूर्ण पंचक्रोशीत या वृत्ताने दु:खाचे सावट पसरले आहे.
शहीद कमलदेव यांच्या पश्चात माता-पिता, भाऊ आणि दोन बहिणी असा परिवार आहे.