नगर – पुरोगामी विचार व विकासाचा अजेंडा घेऊन महाराष्ट्राच्या राजकारणात राष्ट्रवादी कॉंग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार यांनी वेगळे अस्तित्व निर्माण केले. संकट काळात जनतेच्या पाठीशी राष्ट्रवादी नेहमीच उभा राहिला आहे. करोनाच्या संकटकाळात कोकणात आलेल्या चक्रीवादळाने अनेक नागरिक उघड्यावर आले. त्यांचे आश्रू पुसण्यासाठी शरद पवार स्वत: त्यांच्या भेटीला गेले. जाणता राजाचे उत्तम उदाहरण त्यांच्या रुपाने महाराष्ट्राच्या राजकारणात असल्याची भावना जिल्ह्याचे पालकमंत्री हसन मुश्रीफ यांनी व्यक्त केली.
राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाच्या 21 व्या वर्धापन दिनानिमित्त करोना महामारीच्या पार्श्वभूमीवर रक्ताचा तुटवडा भरुन काढण्यासाठी राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या वतीने येथील पक्ष कार्यालयात रक्तदान शिबीराचे आयोजन करण्यात आले होते. या शिबीराच्या उद्घाटनप्रसंगी ना. मुश्रीफ बोलत होते. यावेळी आमदार संग्राम जगताप, जिल्हा परिषद अध्यक्षा राजश्री घुले, जिल्हाध्यक्ष राजेंद्र फाळके, कार्याध्यक्ष संदीप वर्पे, शहर जिल्हाध्यक्ष प्रा. माणिक विधाते, जि.प. सदस्य प्रभावती ढाकणे, निरीक्षक वर्षाताई शिवले, माजी आमदार नरेंद्र घुले पाटील, प्रताप ढाकणे, मंजुषा गुंड, निर्मला मालपाणी, शारदा लगड, अंबादास गारुडकर, विरोधी पक्षनेते संपत बारस्कर, नगरसेवक संजय चोपडा, अविनाश घुले, अमोल गाडे, किसनराव लोटके, सोमनाथ धूत, उबेद शेख, सिताराम काकडे, कपिल पवार, संजय कोळगे, सुरेश बनसोडे, अभिजीत खोसे, बाबासाहेब गाडळकर, महेश बुचडे, अमित खामकर, वैभव ढाकणे, साहेबान जहागीरदार, रेशमा आठरे, साधना बोरुडे, अंजली आव्हाड आदिंसह पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.
ना. मुश्रीफ म्हणाले की, राष्ट्रवादी पक्षाला 21 वर्ष होत असताना सर्वसामान्यांसाठी प्रभावीपणे पक्ष कार्यरत आहे. जगभर करोनाचे संकट असताना मुख्यमंत्री उध्दव ठाकरे व उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या सक्षम नेतृत्वाने करोना संकटावर नियंत्रण मिळवण्यास यश येत आहे. राजकीय कार्यक्रम न घेता रक्तदान सारख्या सामाजिक उपक्रमाने पक्षाचा स्थापना दिन साजरा करीत असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. आमदार संग्राम जगताप म्हणाले की, करोनाची भिती बाजूला सारुन राष्ट्रवादीचा प्रत्येक कार्यकर्ता सर्वसामान्यांना आधार देण्याचा प्रयत्न करीत आहे. राष्ट्रवादीने सर्वसामान्य व्यक्ती केंद्रबिंदू मानून समाजकारण केले.
करोना महामारी व कोकण येथील वादळ अशा संकटकाळात शरद पवार वयाच्या 80 व्या वर्षी सर्वसामान्यांना आधार देत आहे. जिल्ह्यात देखील राष्ट्रवादीच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी करोनाच्या संकटकाळात गरजूंना विविध प्रकारे मदत केली. लाखो नागरिकांपर्यंत मदत पोहचल्याने त्यांच्यामध्ये एक प्रकारची समाधानाची भावना निर्माण झाली व तो कुटुंब राष्ट्रवादीशी जोडला गेले आहेत. सकाळी 10 वाजता प्रारंभी पक्ष झेंड्याचे ध्वजारोहन करण्यात आले. या शिबिरास युवा कार्यकर्त्यांचा उत्सफुर्त प्रतिसाद लाभला. करोना संकटकाळात विशेष योगदान महिला डॉक्टर, परिचारिका, पोलीस, शासकीय अधिकाऱ्यांना मर्दानी महाराष्ट्राची या सन्मानाने पालकमंत्र्यांच्या हस्ते गौरविण्यात आले. सूत्रसंचालन नगरसेवक प्रकाश भागानगरे यांनी केले.