“खरा तो एकचि धर्म जगाला प्रेम अर्पावे’ या साने गुरुजींच्या काव्य व प्रेरणामंत्र आणि सत्याग्रहामुळे स्पृश्य-अस्पृश्यात विभागलेला समाज एक झाला. त्यांच्या लढ्यातून विठ्ठल मंदिरात सर्व जातीधर्मीयांना प्रवेश मिळाल्याने वारकरी संप्रदायाला एक गती मिळाली. गुरुजींच्या जातिभेद नष्ट करण्याच्या प्रयत्नाला यश आले. साने गुरुजी यांची आज पुण्यतिथी त्यानिमित्ताने…
वारकरी संप्रदायात वैचारिक अधिष्ठानाला फार महत्त्व आहे. पांडुरंग महाराष्ट्राचे दैवत आहे. त्याची भक्ती, सेवा करण्याचा सर्व मानवाला अधिकार असल्याचे संतांनी सांगितले; पण धर्ममार्तंडांनी दीन हीन समाजाला पांडुरंगाच्या चरणापासून वर्षानुवर्षे रोखले. मंदिराच्या पायरीपासून चरणापर्यंत अस्पृश्य समाजाला नेण्याचे काम साने गुरुजींनी केले.
त्यावेळेस अस्पृश्य समजल्या जाणाऱ्या वर्गाला सार्वजनिक ठिकाणी जाण्यास मज्जाव होता, तो समाजसुधारकांनी रोखण्याचा प्रयत्न केला त्यापैकी साने गुरुजी यांनी पंढरपूर मंदिर मुक्तीचा जो लढा दिला तो लढा अविस्मरणीय असा आहे. गुरुजी मानवतेचे पुजारी तसेच शब्दांचे पूजक होते. “आता उठवू सारे रान, आता पेटवू सारे रान’ अशा स्फूर्तिदायक गीतांनी महाराष्ट्राच्या मनात जातीय विषमता दूर करण्याचा प्रयत्न केला.
त्यावेळेस महाराष्ट्रात जातीव्यवस्था ही प्रचंड प्रमाणात होती. सर्व मंदिरे उच्च वर्गाच्या वर्चस्वाखाली होती. हा पगडा वर्षानुवर्षे तसाच राहिला होता. अस्पृश्य निवारण झाले नाही तर सामाजाची मोठी अधोगती होईल आणि पिढ्यान्पिढ्या आलेला हा कलंक मिटला जाणार नाही. तो मिटवण्यास समाजसुधारक पुढे आले. यात महात्मा फुले, विठ्ठल रामजी शिंदे, राजर्षी शाहू महाराज, न्यायमूर्ती रानडे, डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांसह साने गुरुजींनी अस्पृश्यांसाठी मंदिर, विहिरी, बारवा, सार्वजनिक ठिकाणे खुली करण्याचा ध्यास तडीस नेला.
विष्णुमय जग वैष्णवांचा धर्म।
भेदाभेद भ्रम अमंगल।
कोणाचाही जीवाचा न घडो मत्सर।
वर्म सर्वेश्वर पूजनाचे।।
संतश्रेष्ठ तुकाराम महाराज या अभंगातून आपण सारे एकाच ईश्वराचे अंश असून माणसामाणसांतील भेदाभेद अमंगळ आहे, असा उपदेश करतात. भेदाभेद नष्ट करण्याची जबाबदारी 18व्या शतकाच्या सुरुवातीपासून समाजसुधारकांनी घेतली. धर्ममार्तंडांनी विधिनिषेध न पाळणाऱ्यांना “सामाजिक बहिष्कार’, “वाळीत टाकणे’ अशा शिक्षा दिल्या. त्याच शिक्षेतून संत आणि समाजसुधारकांनाही सामोरे जावे लागले.
जातिभेद नष्ट करणे, सामाजिक स्वास्थ्य निर्माण करणे, सार्वजनिक ठिकाणे, विहिरी, बारवा, तळी, मंदिरे अशा ठिकाणी अस्पृश्यांना प्रवेश मिळण्यासाठी आंदोलन, मोर्चे, उपोषणे सुरू झाली. तशी कर्मकांडांच्या अधीन झालेली वर्चस्ववादी मंडळी एक होऊन विरोध करू लागली. 1947 साली विठ्ठल मंदिर प्रवेशाच्या वेळी उच्च वर्गाने उच्छाद मांडला होता. मात्र, मंदिर प्रवेश हा मोठा सामाजिक लढा होता.
पांडुरंग सदाशिव साने तथा साने गुरुजी यांनी 1942च्या चलेजाव आंदोलनानंतर महात्मा गांधी व आचार्य विनोबा भावे यांच्या प्रेरणेतून सत्याग्रह, उपोषणे, प्रभात फेऱ्या, प्रार्थना अशा स्वातंत्र्यलढ्याच्या कार्यक्रमात सहभाग घेतला होता. गुरुजी हे समाजवादी विचारांचे होते. त्यांनी समाजातील स्पृश्य-अस्पृश्य भेदाभेद जवळून पहिला होता. संवेदनशील असलेले गुरुजी अत्यंत प्रभावीपणे अस्पृश्य निवारणाचे विचार मांडत. विनोबा भावे यांच्याशी चर्चा करून साने गुरुजींनी पंढरपूरचे विठ्ठल मंदिर अस्पृश्यांसाठी खुले व्हावे व त्यायोगे स्पृश्यास्पृश्य भेदभाव दूर होईल यासाठी उपोषणाची इच्छा व्यक्त केली. पुढे सेनापती बापट यांनी काही काळ थांबून महाराष्ट्रात जनजागृती करण्यास सांगितले.
साने गुरुजींनी “शामची आई’ या साहित्यकृतीमुळे साहित्यातही आपले वेगळे स्थान निर्माण केले. त्यामुळे गावोगावी त्यांचे विचार ऐकण्यास लोक जमा होत होते. त्यांना लोकांचा मोठा प्रतिसाद मिळाला. 1940 साली त्यांनी खिरोदे येथील विठ्ठल मंदिर अस्पृश्यांसाठी खुले केले होते. त्यामुळे समाजात बदल होईल अशी त्यांची मनस्वी भावना होती. महाराष्ट्रातील त्यांच्या या आवाहनास साडेचार लाख लोकांनी सह्या देऊन पाठिंबा दर्शविला. अनेक समाजसुधारक गुरुजींच्या कार्यासाठी धावून आले.
1 मे 1947 रोजी चंद्रभागेत स्नान करून पांडुरंगाचा आशीर्वाद घेऊन गुरुजींनी उपोषण सुरू केलं. त्यांच्या भाषणांत “अस्पृश्यता नष्ट होवो किंवा माझे प्राण जावोत’ ही त्यांनी प्रतिज्ञा होती. हे उपोषण 10 दिवस चालले. समाजवादी नेते, कॉंग्रेस मंडळी, अनेक समाजसुधारक मंडळींनी या उपोषणात सहभाग घेतला. 10 मे 1947 रोजी साने गुरुजींच्या उपोषणामुळे अस्पृश्यांच्या मंदिर प्रवेशास मान्यता मिळून हा लढा यशस्वी झाला.
भारत स्वतंत्र झाल्यानंतर 30 ऑक्टोबर 1947 रोजी अस्पृश्यांचा मंदिर प्रवेश पार पडला. त्यामुळे 30 ऑक्टोबर हा दिवस हरिजन सेवक संघातर्फे “मंदिर प्रवेश दिन’ म्हणून दरवर्षी साजरा करण्याचे घोषित करण्यात आले. “बलसागर भारत होवो, विश्वात शोभूनी राहो’ हा गुरुजींचा विचार समाजाला खऱ्या अर्थाने पटला. 11 जून 1950 रोजी साने गुरुजींचे निधन झाले.
– विठ्ठल वळसेपाटील