नुकसानीकडे प्रशासनाचे दुर्लक्ष : भरपाईसाठी बळीराजाचा आक्रोश सुरूच
पुणे – जिल्ह्याला पावसाने चांगलेच झोडपून काढले. यात शेतीचे मोठे नुकसान झाले आहे. पण, प्रशासकीय अधिकारी आणि कर्मचारी निवडणूक कामात असल्याने शेतकऱ्यांच्या नुकसानीकडे लक्ष देण्यास कोणालाही वेळ मिळाला नाही. त्यामुळे शेतकरी हतबल झाला असून, तो भरपाईच्या प्रतीक्षेत आहे.
यंदा नैऋत्य मोसमी पावसाने राज्याला चांगलेच झोडपून काढले असून, मागील महिनाभरापासून अतिवृष्टी, तसेच परतीच्या पावसामुळे जिल्ह्यातील शेतीपिकांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. त्यामुळे नुकसानभरपाई मिळावी, यासाठी शेतकऱ्यांकडून मोठ्या प्रमाणावर मागणी होत असल्याच्या पार्श्वभूमीवर राज्य शासनाने नुकसान झालेल्या शेतीपिकांचे येत्या आठ दिवसात पंचनामे करण्याचे आदेश दिले आहेत. तर हे पंचनामे तलाठी, ग्रामसेवक, कृषी सहायक या तिघांनी एकत्रितरित्या पाच दिवसांत जिल्हा परिषदेत सादर करावेत, असे आदेश जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी उदय जाधव यांनी दिली.
यावर्षी सततचा पाऊस, अतिवृष्टी, तसेच जोरदार परतीच्या पावसाने जिल्ह्यातील नुकसान झालेल्या शेतीपिकांचे आतापर्यंत शासनाकडून तीन वेळा पंचनामे झाले अहेत. आता हे पंचनामे चौथ्यांदा होत आहेत. खरिपाचे पीक तयार झाल्यानंतर ऐन मोक्याच्या क्षणी या पावसाने शेतीचे नुकसान झाले आहे. दरम्यान, या पावसामुळे हातातोंडाशी आलेल्या खरीप पिकांचे जसे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. तसेच पेरण्या झालेल्या रब्बी पिकांचे नुकसान झाले आहे. सोयाबीन, भुईमूग, भातपिकाबरोबरच भाजीपाला पिकांना तडाखा बसला आहे. विशेषत: द्राक्ष बागांचे अतोनात नुकसान झाल्याची माहिती जिल्हा परिषदेचे कृषी विकास अधिकारी अनिल देशमुख यांनी दिली.