बळीराजाचे खंडेरायाला साकडे : जेजुरी गडाव चैत्र पौर्णिमा उत्साहात
जेजुरी – कुलदैवत खंडेरायाचा चैत्र पौर्णिमा उत्सव मंगळवारी (दि.23) साजरा करण्यात आला. यावेळी जेजुरी येथील मल्हारगडावर राज्याच्या विविध प्रांतातून आलेल्या बहुजन बांधव विशेषतः शेतकरी आपल्या परिवारासह दाखल झाला होता.
देवदर्शन -भंडारा उधळण, देवांचा जागर, तळीभंडार आदी धार्मिक विधी करत भाविकभक्तांनी कुलदैवताला यंदा पाऊस पाणी होऊ दे, बळीराजाला सुगीचे दिवस येऊ दे अशी प्रार्थना केली.
सातारा, नगर येथून काही गावांतील शिखरीकाठ्या गडावर वाजत-गाजत दाखल होत मुख्य मंदिराच्या कळसाला टेकवल्या जात होत्या.चैत्र शुद्ध पौर्णिमा, दुसरा प्रहर, चित्रा नक्षत्र, वसंत ऋतू या शुभ दिनी व वेळी शिवशंकराने मार्तंड भैरवांचा अवतार धारण केला अशी आख्यायिका आहे.
पुरातन काळापासून हा दिवस खंडेरायाचा अवतार दिन म्हणून साजरा करीत जेजुरीत मोठा उत्सव साजरा केला जातो. विशेषतः शेतीची मशागतीची कामे उरकलेली असल्याने या यात्रेला बहुजन बांधव आपल्या कुटुंब कबिल्यासह जेजुरीत दाखल होत कुलधर्म कुलाचार करत असतो.
यंदा मात्र तीव्र दुष्काळ, पाणीटंचाई आणि निवडणुकीचे दिवस याचा परिणाम यात्रेवर दिसून येत होता.दरवर्षीच्या मानाने यावेळी भाविकांची संख्या कमी होती.