ज्ञानेश्वर खिलारी; योजनेच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी प्रयत्न
सातारा – जल जीवन मिशन योजनेची प्रभावी प्रचारासाठी ज्युनिअर व सिनिअर महाविद्यालयीन स्तरावर वक्तृत्व स्पर्धेचे जिल्हास्तरावर आयोजित करण्यात येत आहेत, अशी माहिती जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी ज्ञानेश्वर खिलारी यांनी दिली.
जिल्हयातील सर्व ज्युनिअर व सिनिअर महाविद्यालयामध्ये वक्तृत्व स्पर्धेचे आयोजन करण्यात येणार आहे. पाऊस पाणी संकलन, पाणी आडवा पाणी जिरवा, जल हेच जीवन, माझ्या गावातील पाणी पुरवठा , पाण्याचे स्त्रोत बळकटीकरण, पाण्याचे सुयोग्य वितरण व देखभाल दुरुस्ती हे या स्पर्धेसाठी विषय असणार आहेत. ज्युनिअर महाविद्यालय गटातून प्रथम, व्दितीय, तृतीय व सिनियर गटातून प्रथम, व्दितीय, तृतीय स्पर्धकांची निवड करण्यात येणार आहे.
तालुकास्तरीय वक्तृत्व स्पर्धा दि.10 जानेवारी ते दि.13 जानेवारी या दरम्यान होणार आहेत. दोन्ही गटातील प्रत्येकी प्रथम, द्विती तृतीय अशा ६ स्पर्धकांची नावे तालुका स्तरावरून गट विकास अधिकारी यांच्या पत्रासह दि. 17 जानेवारी रोजी प्रकल्प संचालक तथा उपमुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा पाणी व स्वच्छता मिशन, जि. प. यांना कळविण्यात येणार आहेत.
तालुका स्तरावर निवड झालेल्या ज्युनियर व सिनियर या दोन्ही गटातील प्रति तालुका ६ निवडक विजेत्या स्पर्धकांची जिल्हा स्तरावर नियोजित दिवशी वक्तृत्व स्पर्धा जिल्हास्तरीय समितीच्या मार्गदर्शनाखाली घेण्यात येणार आहे. जिल्हा स्तरावर निवड झालेल्या ज्युनियर व सिनियर या दोन्ही गटातील प्रत्येकी ३ अशा ६ विजेत्या स्पर्धांकास जिल्हास्तरीय कार्यशाळा किंवा विशेष कार्यक्रम घेऊन सम्मानित करून बक्षीसाचे वितरण करण्यात येणार आहे.