Sharmila Thackeray : दिवंगत अभिनेता सुशांतसिंह राजपूतची मॅनेजर दिशा सॅलियनच्या मृत्यू प्रकरणात आमदार आदित्य ठाकरे (Aditay Thackeray) यांची अडचण वाढण्याची शक्यता आहे. यावरून भाजप आमदार नितेश राणेंकडून आदित्य ठाकरे यांच्यावर सातत्याने आरोप केले जात आहेत. यातच राज ठाकरे यांच्या पत्नी शर्मिला ठाकरे यांनी आदित्य असं काही करेल असं मला वाटत नाही, अशी प्रतिक्रिया दिली होती. त्यावर उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी शर्मिला ठाकरेंचे (Sharmila Thackeray) यांचे आभार मानले होते.
यावर आता शर्मिला ठाकरेंनी ‘मी माझ्या पुतण्यावर विश्वास दाखवला, पण तुम्ही ज्या भावाबरोबर लहानाचे मोठे झालात, त्याच्यावर थोडा तरी विश्वास दाखवायला हवा होता, अशी प्रतिक्रिया दिली आहे. शर्मिला ठाकरे यांनी दिशा सालियन मृत्यू प्रकरणी स्थापन एसआयटी चौकशीवरून आदित्य ठाकरे यांची पाठराखण केली होती. त्यावरून संजय राऊत आणि उद्धव ठाकरे यांनी शर्मिला ठाकरे यांचे आभार मानले होते. त्यावर शर्मिला यांनी प्रतिक्रिया दिली.
“मला वाटतं, असे आभार मानायची संधी उद्धव ठाकरेंनी मला आयुष्यात कधीच दिली नाही. मी माझ्या पुतण्यावर विश्वास दाखवला, ज्या भावासोबत तुम्ही लहानाचे मोठे झालात, त्याला किणी केसच्या वेळी काय मदत केलीत? आजपर्यंत टोमणे देणं त्यांनी कधी थांबवलं आहे? कोणतीही वेळ आली की किणी केसवरुन टोमणे देतात. तुमच्या भावावर कधीतरी विश्वास ठेवून दाखवा, मग आम्हीपण आभार मानू” असंही शर्मिला ठाकरे म्हणाल्या.
लालबाग येथील शाखेच्या वर्धापन दिनानिमित्त शर्मिला ठाकरे बोलत होत्या. यावेळी त्यांनी अदानी प्रकरणावर देखील भाष्य केले आहे. “आम्ही लोकसभेसाठी काम करत नाही. आम्ही कोविड काळापासून काम करत आहोत. उद्धव ठाकरे यांचं सरकार आलं तेव्हा धारावीबद्दल का निर्णय घेतले नाहीत? सरकार आल्यानंतर काही महिन्यांनी करोना आला. त्यावेळी तुमचं सरकार असताना तुम्ही का निर्णय घेतले नाहीत? तुम्हाला कोणी अडवलं होतं? धारावीचा पुनर्विकास करायचा होता तर तुमचं सरकार असताना करून टाकायचा, कोणी तुमचे हात धरले होते?” असा सवाल शर्मिला ठाकरे यांनी उद्धव ठाकरे यांना केला.
काय म्हणाल्या होत्या शर्मिला ठाकरे?
राज ठाकरे यांच्या पत्नी आणि आदित्य ठाकरे यांच्या काकी शर्मिला ठाकरे (Sharmila Thackeray) यांनी ‘मला असं वाटत नाही आदित्य असं काही करेल, चौकशा तर कोणीही लावेल, आम्ही पण यातून गेलो आहोत,’ असे म्हणत आदित्य ठाकरे यांची पाठराखण केली होती.